MPSC Student Issue : MPSC विद्यार्थ्यांचा मुद्दा तापला, थेट ऑफिसमध्ये घुसून संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांच्या तोंडाला फासलं काळ
MPSC Student Issue : महाराष्ट्रात सध्या MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासण्याची घटना घडली आहे.

योगेश बोरसे प्रतिनिधी : महाराष्ट्रात सध्या MPSC च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न गाजत आहे. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्यापासून एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर उतरुन MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. आज नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासलं. MPSC चे अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी एमपीएससीच्या परीक्षार्थींची मागणी आहे. कारण पेपर फुटीचं हे प्रकरण त्यांच्या कार्यकाळात घडलं आहे. पेपर फुटीमध्ये MPSC मध्ये काम करणाऱ्या लोकांचा सहभाग असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अशा पद्धतीची लोकं MPSC वर नसवीत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज एमपीएससी सचिवांच्या तोंडाला काळं फासून एकप्रकारे त्यांच्या अध्यक्षांना इशारा दिला आहे. नवी मुंबईच्या कार्यालयात जाऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे काम केलं. या घटनेचे पडसाद उमटू शकतात. रोहित पवारही MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांनी सुद्धा MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरले आहेत.
सुप्रिया सुळेंना नाही पटलं
महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासण्याच्या या प्रकाराशी खासदार सुप्रिया सुळे यांनी असहमती व्यक्त केली. “हे करणं योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधले माझे सहकारी आहेत, विकास लवांडे यांच्यासोबत सुद्धा असचं घडलेलं. त्यांच्यावर असाच हल्ला केलेला. तोंडाला काळं फासून प्रश्न सुटत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मतभेद असू शकतात. पण लोकशाहीत मतभेद असले पाहिजेत. पण तोंडाला काळं फासणं वैगेरे संस्कृती योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी यावर बैठक घेतली होती. हवं तर पुन्हा बैठक घेऊ” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीस यांचं मत काय?
MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेण्याच्या मागणीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहमत नाहीयत. “एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन फायदा नाही, पेपरफुटीचे प्रकरण घडले त्यावेळी विद्यमान अध्यक्ष नव्हते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं अतार्किक आहे. राजीनामा घेतल्याने काही फायदा होईल असं मला वाटतं नाही” असं मुख्यमंत्री फडणवीस यांचं मत आहे.