अमावस्येला दारात लिंबु-हळदकुंकू आणि बांगड्या,घरातील वस्तूंना अचानक आग, रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट

अहिल्यानगरातील राहुरीत एका घरात अचानक कपडे पेटणे, घरासमोर लिंबू मिरच्या टाकण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

अमावस्येला दारात लिंबु-हळदकुंकू आणि बांगड्या,घरातील वस्तूंना अचानक आग, रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट
black magic
| Updated on: May 18, 2026 | 7:16 PM

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे जादूटोणा आणि भानामतीच्या संशयाने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कारवाडी परिसरात एका घरात कपडे, कागदपत्रे आणि इतर वस्तूंना अचानक आग लागत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.अमावस्येच्या रात्री घरासमोर लिंबू-मिरचीसह काही संशयास्पद वस्तू आढळल्याने जादूटोण्याची चर्चा रंगली आहे.सचिन रणधीर आणि साईनाथ रणधीर यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अचानक वस्तूंना आग लागत असल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातही नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

सचिन रणधीर यांच्या घरात मागेही साल २०२२ मध्ये असेच भानामतीचे प्रकार घडले होते. त्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर अनाप यांना पाचारण केले होते. त्यांनी त्यांना घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर अनेक वर्षे असे प्रकार थांबले होते. आता पुन्हा त्यांच्या घरातील कपडे आपोआप पेटणे आणि शनिवारी अमावस्येला घराच्या दारात लिंबू मिरच्या टाकण्याचा प्रकार घडल्याचे सचिन रणधीर यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे ते घाबरुन गेले आहेत.त्यांच्या घरातील या अजब प्रकारामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

वैज्ञानिक कारणांचा शोध घेणे आवश्यक

संबंधित घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. त्यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे. कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक घटनेमागे कारण असते. तसेच कपडे पेटणे वगैरे घटनांना वैज्ञानिक कारण असते. या कपड्यांवर केमिकल किंवा काही रासायनिक पदार्थ लपवलेले असू शकतात. त्यामुळे उष्णतेने हे पदार्थ पेटत असावेत. या मागे कोणताही भानामती वगैरे प्रकार नाही. जर कोणी असा दावा करत असेल तर अंधश्रद्धा निर्मुलन समिती त्याला २१ लाखांचे बक्षिस देते असेही त्यांनी सांगितले. या प्रकारामागील वैज्ञानिक कारणांचा शोध घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहनही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.

Follow Us