Sambhaji Chhatrapati : संभाजी छत्रपती अपक्ष लढण्याच्या खेळीमागे फडणवीसच, संभाजीराजेंच्या वडिलांचा मोठा खुलासा; घराण्याच्या अवमानावर म्हणाले…

| Updated on: May 28, 2022 | 6:27 PM

Sambhaji Chhatrapati : भाजपने त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आम्ही त्यांना भाजपची ऑफर स्वीकारू नये म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी निर्णय घेतला.

Sambhaji Chhatrapati : संभाजी छत्रपती अपक्ष लढण्याच्या खेळीमागे फडणवीसच, संभाजीराजेंच्या वडिलांचा मोठा खुलासा; घराण्याच्या अवमानावर म्हणाले...
संभाजी छत्रपती अपक्ष लढण्याच्या खेळीमागे फडणवीसच, संभाजीराजेंच्या वडिलांचा मोठा खुलासा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी राज्यसभेच्या मैदानात उडी घेतल्यानंतर त्यांनी अखेर माघारही घेतली. शिवसेनेने (shivsena) आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून संभाजीराजे प्रयत्नात होते. पण शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घातल्याने संभाजीराजेंना राज्यसभेवर जाता आलं नाही. अपक्ष लढण्यावरच संभाजी छत्रपती अखेरपर्यंत ठाम होते. कोणत्याही पक्षात प्रवेश नको म्हणून त्यांनी अपक्ष लढण्यावरच भर दिला. संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अनेक तर्क लढवले गेले. छत्रपती घराण्याने कोणत्याही पक्षात प्रवेश करणं योग्य नसल्यानेच संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचं सांगितलं जात आहे. तर, राष्ट्रवादीकडून (ncp) निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेश करण्यात काय अडचण होती? असा सवालही केला जात आहे. तर, संभाजीराजेंना अपक्ष म्हणून राज्यसभेला उतरवण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांचीच होती, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाजांनी केला. तसेच संभाजीराजेंना तिकीट न मिळणं हा छत्रपती घराण्याचा अवमान म्हणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर शाहू छत्रपती महाराज यांनी पहिल्यांदाच त्यावर भाष्य केलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. संभाजीराजेंना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला असं म्हणता येत नाही. कारण ही पूर्णपणे राजकीय भूमिका होती. संभाजीराजेंनी अपक्ष उभं राहावं ही भाजपची आणि देवेंद्र फडणवीसांची खेळी होती. त्यांनीच त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यास भाग पाडलं होतं, असं श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितलं.

बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव

संभाजी छत्रपती यांनी जानेवारीपासूनच राज्यसभेसाठी प्रयत्न सुरू केले होते. कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी फडणवीसांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले, असं सांगतानाच बहुजन समाजाच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच भाजपनं संभाजीराजेंना अपक्ष लढवण्याची खेळी केली, असा दावा  श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केला.

भाजपची ती ऑफर स्वीकारू नये म्हणून सांगितलं होतं

फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. त्यानंतर त्यांच्यासमोर राज्यसभेसाठी दोनच पर्याय होते. एक म्हणजे स्वबळावर पुढे जाणं किंवा इतर पक्षांचा पाठिंबा घेणं, असंही त्यांनी सांगितलं. भाजपने त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आम्ही त्यांना भाजपची ऑफर स्वीकारू नये म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी जे जे राजकीय निर्णय घेतले. त्याबाबत आमच्याशी चर्चा केली नाही. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी नाकारली गेली असेल तर त्यात छत्रपती घराण्याचा अपमान झाला असं म्हणता येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.