ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारचा उपक्रम, ‘शरद शतम आरोग्य कवच विमा योजने’वर काम सुरु

| Updated on: Sep 22, 2021 | 3:55 PM

राज्यातील 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी/चाचण्या करणे, त्यांना शरद शतम आरोग्य कवच विमा योजना लागू करणे. या महत्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारचा उपक्रम, शरद शतम आरोग्य कवच विमा योजनेवर काम सुरु
धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
Follow us on

मुंबई : राज्यातील 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी/चाचण्या करणे, त्यांना शरद शतम आरोग्य कवच विमा योजना लागू करणे. या महत्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरु आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. (Sharad Shatam Arogya Kavach Bima Yojana, Dhananjay Munde’s initiative)

ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांबाबत शिफारशी करणे. या योजनेअंतर्गत आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करणेबाबतच्या कार्यपध्दतीबाबत शिफारस करणे. योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधीत ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त होण्याबाबत व त्यात आजार आढळल्यास त्याचे निदान करणेबाबत, तसेच आरोग्य विभागाच्या व इतर योजनेमध्ये अभिसरण करण्याची कार्यपध्दतीबाबत शिफारस करणे. इत्यादी बाबींसह शरद शतम योजनेच्या एकूण कार्यपद्धतीला निश्चित करण्यासाठी शिफारशी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी या समितीवर नेमण्यात आली आहे. या समितीने ठराविक वेळेत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

सुधाकर शिंदे समितीचे अध्यक्ष

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, एन यु एच एमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, डी एम ई आरचे उपसंचालक डॉ. अजय चांदनवाले, जे जे रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ग्रामविकास विभागातील आस्थापना उपसचिव, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आस्थापना उपसचिव हे या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार समितीचे पुनर्गठन

दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर राहिलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेस गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या नावाने स्वतंत्र पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वायत्त बहाल करण्यात आले आहे. याबाबतचा शासननिर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे. या पदवी व पदविका संस्था व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. सल्लागार मंडळास आवश्यक असणारा निधी, त्याचे स्वतंत्र लेखापरीक्षण तसेच फेलो, सिनिअर फेलो अशा विविध पदांची व कंत्राटी पदांची भरती करण्याबाबतही मुभा देण्यात आली आहे.

सल्लागार मंडळाला आणि संस्थेस मूर्त स्वरूप प्राप्त

ग्रामीण कौशल्य विकास, शेतीआधारीत विशेष शिक्षण आदी महत्वाच्या विषयांशी संलग्न असलेली ही संस्था मागील अनेक वर्षांमध्ये केवळ घोषणा व कागद इतकीच मर्यादित राहिली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार मंडळाला आणि संस्थेस मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. धनंजय मुंडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे याबद्दल आभार मानले आहेत.

इतर बातम्या :

‘उलट सुलट आरोपांपेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या’, रामदास आठवलेंचा राऊतांना सल्ला

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडी नेत्यांना विजयाचा विश्वास

Sharad Shatam Arogya Kavach Bima Yojana, Dhananjay Munde’s initiative