Shivsena | देशाचच नाही तर जगाचं लक्ष शिवसेनेच्या खटल्याकडे! लोकशाहीची दिशा ठरवणारा निर्णय ठरेल, उद्धव ठाकरेंचा इशारा कुणाकडे?

एकनाथ शिंदे गटातील आमदार सूरतला गेले. तेथून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'सूरतेला जाऊन बोलण्यापेक्षा सूरत दाखवून बोलला असतात तर बरं झालं असतं...

Shivsena | देशाचच नाही तर जगाचं लक्ष शिवसेनेच्या खटल्याकडे! लोकशाहीची दिशा ठरवणारा निर्णय ठरेल, उद्धव ठाकरेंचा इशारा कुणाकडे?
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jul 08, 2022 | 2:56 PM

मुंबईः शिवसेनेनं 16 आमदारांवर कारवाई केल्यासंबंधीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात (Supreme court) 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रासह देशाचंच नाही तर जगाचं लक्ष या खटल्याकडे आहे. कारण या खटल्याच्या सुनावणीनंतरच लोकशाहीची दिशा काय आहे, हे कळेल, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलाय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता जनतेशी संवाद साधला. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून कोर्टानं दिलेला निर्णय मला मान्य असेल. निर्णय काहीही असला तरीही एक-दोन लोकं गेल्याने शिवसेना (Shivsena Party) संपणार नाही तर अजूनही अनेक साध्या-साध्या माणसांमुळे शिवसेना टिकून आहे. त्यांच्याच आधारावर शिवसेना मोठी होईल, टिकेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

जगाचं लक्ष सुनावणीकडे…

11 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीकडे अवघं जग पाहत आहे, असा इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ न्यायदेवतेवर विश्वास आहे. सुनावणी उद्याची जी केस आहे. ती देशात लोकशाहीचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे. किती मजबूत राहणार आहे, हे दाखवून देणारी ठरले. या केसकडे देशाचं लक्ष आहे. भारतात सर्वात मोठी लोकशाही असल्यामुळे जगाचंही या केसकडे लक्ष आहे. या देशातील लोकशाहीचे चार स्तंभ कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करतायत की नाही, हे यातून स्पष्ट होईल,

कोणत्या केसची सुनावणी?

एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या 16 बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली. मात्र शिंदेगटाने याविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. मुळात ही कारवाई करणाऱ्या उपाध्यक्षांविरोधातच शिंदे गटातील आमदारांनी अविश्वास दर्शवला होता. त्यामुळे या प्रकरणी मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी की उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी, याचा निर्णयही सोमवारी होणाऱ्या सुनावणीत होऊ शकतो. याच निकालावर शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर अवघ्या देशासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे.

सूरतेला जाण्यापेक्षा सूरत दाखवली असती तर…

एकनाथ शिंदे गटातील आमदार सूरतला गेले. तेथून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सूरतेला जाऊन बोलण्यापेक्षा सूरत दाखवून बोलला असतात तर बरं झालं असतं. मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्यबद्दल त्यांना प्रेम आहे, याबद्दल मी आभार मानतो. हे प्रेम जे आता दाखवत आहात. पण जे लोक मागील अडीच वर्षात जे माझ्याविरुद्ध बोलत होते, तेव्हा दातखिळी का बसली होती. आम्हाला आजपर्यंत कुणाला बोलण्याची हिंमत नव्हती. अशा अत्यंत विकृत टीका केली. ज्यांनी टीका केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. त्यांना मिठ्या मारत आहात. मग हे प्रेम खरं आहे की तकलादू आहे? ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होता. अशा लोकांसोबत तुम्ही आहात. त्यामुळे हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us