निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का? नीलम गोऱ्हे यांची थेट निवडणूक आयोगात तक्रार, अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार?

नीलम गोऱ्हे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत अरविंद सावंत यांच्या वक्तव्याची तक्रार केली आहे. "महिलांचं अपमान करणाऱ्या विधानावर त्वरित कारवाई करावी", अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का? नीलम गोऱ्हे यांची थेट निवडणूक आयोगात तक्रार, अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार?
नीलम गोऱ्हे आणि अरविंद सावंत
Chetan Patil | Updated on: Nov 01, 2024 | 5:27 PM

शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांनी ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अरविंद सावंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी शायना एन. सी. पोलीस ठाण्यात गेल्या तेव्हा बाहेर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्याच्या विरोधात थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. नीलम गोऱ्हे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत अरविंद सावंत यांच्या वक्तव्याची तक्रार केली आहे. “महिलांचं अपमान करणाऱ्या विधानावर त्वरित कारवाई करावी”, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

“स्त्रियांबद्दल अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाही”, असा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाकडून आता काही कारवाई होते का? कारवाई केली तर अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी अरविंद सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. “अरविंद सावंत महाराष्ट्रातील जनतेला आणि महिलांना मुर्ख समजतात का? त्यांना काहीच अक्कल नाही, असं त्यांना वाटतं का? आता ते सारवासारव करत आहेत”, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली

अरविंद सावंत यांचं वक्तव्य नेमकं काय?

अरविंद सावंत यांनी शायना एन. सी. यांच्याबद्दल संबंधित वक्तव्य केलं. “त्यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण काय?

“माझं वक्तव्य त्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलं आहे. मी हिंदीमध्ये बोललो आहे माल म्हणून. पण इंग्रजीमध्ये मालला गुड्स असं बोललं जातं. मी बाहेरून आलेला माल आणि इथे ओरिजनल असलेला माल असं मी बोललो आहे. माझ वक्तव्य अर्ध दाखवण्यात आलं आहे. पण आता तुम्हाला महिला सन्मान लक्षात आला का? प्रज्ज्वल रेड्डीच्या प्रचारात पंतप्रधान गेले तेव्हा त्यांना महिला सन्मान आठवला नाही का? मंत्री संजय राठोड यांच्याच मंत्रिमंडळात होते ना? मग तेव्हा त्यांना महिला सन्मान आठवला नाही का?”, असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिलं आहे. दरम्यान, भाजप नेते प्रसाद लाड यांनीदेखील सावंत यांच्यावर टीका केली आहे. त्यावरही सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रसाद लाड यांची भूमिका दुटप्पी आहे. त्यांनी संजय राठोड यांच्या संदर्भात पाहिली भूमिका स्पष्ट करावी”, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

प्रसाद लाड काय म्हणाले?

“मुंबादेवी विधानसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबद्दल उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो. अरविंद सावंत यांनी माफी मागितली पाहिजे कारण एका महिलेचा सन्मान करण्याची पद्धत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना शिकवलेली आहे, पण त्याच्या विपरीत काम अरविंद सावंत यांनी केले आहे”, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.

शायना एन. सी. यांची प्रतिक्रिया काय?

अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर शायना एन. सी. यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उज्ज्वला, मुद्रा बँकिंग, आवास योजना आहे, जिथे महिलांना सशक्त बनवलं जात आहे. एका आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती बनत आहे, तर दुसरीकडे अरविंद सावंत मला इंपोर्टेड माल म्हणत आहेत. महिलांना ऑब्जेक्टिपाय करणं ही त्यांची मानसिकता आहे. काँग्रेस आमदार अमीन पटेल तेव्हा हसत होते. येत्या 20 नोव्हेंबरला मविआ बेहाल होणार”, अशी टीका शायना एन. सी. यांनी केली आहे.

Follow Us