‘शरद पवार यांना आम्ही सांगायला नको’, संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय घडणार?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. पण शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

शरद पवार यांना आम्ही सांगायला नको, संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय घडणार?
Chetan Patil | Updated on: Jul 31, 2023 | 5:43 PM

नवी दिल्ली | 31 जुलै 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत. या दरम्यान पुण्यातही उद्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. पण शरद पवार यांनी या कार्यक्रमाला हजर राहू नये असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मत आहे. पण शरद पवार कार्यक्रमाला हजर राहण्यास ठाम आहेत. असं असताना खासदार संजय राऊत यांनी आज दुसऱ्यांदा शरद पवार यांना कार्यक्रमाला हजर न राहण्याचं आवाहन केलं आहे.

“नाराज कशाकरता व्हायचं? काही नाही, शरद पवार यांनी कार्यक्रमाला जाऊ नये असं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची भावना आहे. आम्ही शरद पवार यांना सल्ला देणार नाहीत. पण साधारणपणे जे पाहतोय, वाचतोय, बोलतोय, ऐकतोय ते पाहिल्यावर समजतंय की लोक अस्वस्थ आहेत. लोकांच्या मनामध्ये अस्वस्था आहे, ती स्पष्ट खदखद त्यांना दिसतेय”, असं संजय राऊत म्हणाले.

‘शरद पवार यांना आम्ही सांगायला नको’

“ज्याप्रकारच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणात घडल्या, या देशात आणि राज्यात जे चाललंय ते लोकांना मान्य नाहीय. त्याचे कर्तेधर्ते जे कुणी असतात त्यांना कोणता पुरस्कार मिळावा, त्यांना नोबेल पुरस्कार मिळावा, त्यांना अजून कुठला पुरस्कार मिळावा हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्या पुरस्कारा संदर्भात कोणतीही भूमिका घेणार नाहीत. पण महाविकास् आघाडीतील आणि इंडिया या घटकातील नेते अशा ठिकाणी जातात तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. शरद पवार इतके अनुभवी नेते आहेत की त्यांना हा संभ्रम काय आहे याच्याविषयी आम्ही सांगायला नको”, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

“संभ्रम शरद पवार यांच्याविषयी आहे. आमच्या संघटनेविषयी नाही. त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम असू शकतो. तो त्यांनी दूर करायचा आहे. पण आम्ही एक आहोत. महाविकास आघाडी घट्ट आहे आणि इंडिया त्याहून जास्त घट्ट आहे”, असंदेखील संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कालच एका कार्यक्रमात एकत्र होते. यावर चर्चा करण्याची गरज नाही ज्याने त्याने आपापल्या भूमिका अशावेळेस ठोकून घ्यायच्या असतात”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us