Shivsena | शिवसेना कुणाची? दोन्ही गटाकडे आजची शेवटची मुदत, निवडणूक आयोगासमोर 3 वाजेपर्यंत पुरावे सादर करावे लागणार

| Updated on: Aug 08, 2022 | 9:39 AM

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून आज 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दोन्ही पक्ष परस्परांविरोधात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

Shivsena | शिवसेना कुणाची? दोन्ही गटाकडे आजची शेवटची मुदत, निवडणूक आयोगासमोर 3 वाजेपर्यंत पुरावे सादर करावे लागणार
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि मूळ शिवसेना (Shivsena) या दोन्ही पक्षांना आज निवडणूक आयोगापुढे (Election Commission) आम्हीच शिवसेना आहोत, यासंदर्भातले पुरावे सादर करावे लागणार आहेत. आज या प्रक्रियेसाठीची अंतिम मुदत आहे. शिवसेना म्हणजे आम्हीच आहोत आणि आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह मिळावे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी निवडणुक आयोगाकडे केला होता. यावर उद्धव ठाकरे गटाचा आक्षेप आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. आज 8 ऑगस्ट रोजी याची मुदत संपत असून दुपारी 3 वाजेपर्यंत पुरावे सादर केले जातील. त्यामुळे एकिकडे सुप्रीम कोर्टात दोन्ही गटांचे परस्परांविरुद्ध तगडे युक्तिवाद होत असतानाच आता निवडणूक आयोगात शिवसेना आमचीच आहे, यासाठी दोन्ही गटांमार्फत काय पुरावे सादर केले जातात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

परस्पर विरोधी याचिका दाखल होणार?

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून आज 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र शिवसेना आपल्या वकिलांमार्फत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडे दावा करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांची मागणी स्थगित करण्यात यावी, अशी याचिका उद्धव ठाकरे गटातर्फे करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांचा गटही आम्हीच शिवसेना आहोत, बहुमताचा आकडा आमच्याच बाजून आहे, त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याचकडे असावे, यासाठीची याचिका वकिलांमार्फत निवडणूक आयोगाकडे सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच आज निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांचे परस्पर विरोधी दावे, पुराव्यानिशी सादर होतील.

एकनाथ शिंदे गटाचा दावा….

एकनाथ शिंदे गटाच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्याकडे आमदार, खासदर, नगरसेवक तसेच शिवसेनेतील अनेक संघटनांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे आम्ही विधीमंडळात तर मोठा गट आहोतच, पण संपूर्ण पक्षातही शिंदे गटाला बहुमत आहे. आमदार उदय सामंत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, आता तर ग्रामपंचायत निवडणुकीतही उद्धव ठाकरे गटापेक्षा एकनाथ शिंदे गटाला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावर आमचाच दावा खऱा आहे..

मूळ शिवसेनेचा दावा काय?

उद्धव ठाकरे यांच्या मुळ शिवसेनेच्या दाव्यानुसार, विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षातील आमदार हे पक्षाच्या चिन्हामुळे निवडून आलेले असतात. पक्ष तिकिट देतो, एबी फॉर्म देतो, तेव्हा हे आमदार निवडून येतात. मात्र विधिमंडळ गट वगळता शिवसेनेचे 40 ते 50 लाख सभासद आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षावर हे दावा सांगू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.