लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा, थेट मंत्र्यानेच दिली मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मंत्री जयकुमार गोरे यांनी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देणारे विधान केले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे गावा खेड्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होत आहे. मात्र या योजनेसाठी दरमहा कोट्यवधी रूपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी ही योजना बंद होणार असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मंत्री जयकुमार गोरे यांनी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देणारे विधान केले आहे. गोरे यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात.
लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा
जयकुमार गोरे हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना गोरे यांनी म्हटले की, ‘सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहिणींचा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा बोजा असला तरी राज्य सरकार सक्षम आहे. राज्याच्या विकासाला पैसा कमी पडणार नाही. आगामी काळात कुठल्याही निधीमध्ये कपात केली जाणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सरकारने निर्णय घेतलेले आहेत.’
ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू
ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे काही महिलांना 1500 रुपयांच्या हप्त्यापासून वंचित रहावे लागत होते. अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे, त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करण्यात आली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार पुढील सहा महिन्यांच्या काळात लाडक्या बहिणींना ही ई-केवायसी करून घेता येणार आहे.
2100 रुपयांच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट
महायुती सरकाराने लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ वाढवून 2100 रुपयांपर्यंत केला जाईल, असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे. यावर बोलताना तटकरे यांनी सांगितले की, ‘लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली जात आहे. या योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का? या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील.’
