Anjali Damania : पोलिसांची नाव चार्जशीटमध्ये का नाही? अंजली दमानियांचा सवाल

"धनंजय मुंडे यांना सगळी कल्पना आहे. त्यांना माहिती आहे. अवादा कंपनीची बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती, तिथे हे सगळे हजर होते. दोन पोलीस अधिकारी होते. ही सगळी माहिती आहे. पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का?" असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

Anjali Damania : पोलिसांची नाव चार्जशीटमध्ये का नाही? अंजली दमानियांचा सवाल
anjali damania
| Updated on: Mar 10, 2025 | 10:16 AM

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. “बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की, 9 तारखेपासून तांदळे हा पोलिसांबरोबर फिरत होता. हे प्रकरण शेकायला लागलं, तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी या लोकांना अटक करुन तिथल्या तिथे निपटवा. यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. “हे जे लेटर आहे, पोलीस खात्याने बालाजी तांदळेला 15 तारखेच लिहिलेल पत्र आहे. 9 तारखेपासून बालाजी तांदळे पोलिसांसोबत फिरत होते. लेटर दिलं 15 तारखेला. कुठच पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगत, तू तुझी गाडी घेऊन ये आपण शोध घेऊ. याच्यात धनंजय मुंडे यांचा दबाव होता. पोलिसांवर दबाव होता” असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

“बालाजी तांदळेने देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी आहे की, पोलिसांनी आरोपी शोधलेले नाहीत. आम्ही गाड्या फिरवून आरोपींचा शोध घेतला, सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं. यांच्यापर्यंत येऊ नये. माझी पहिली मागणी ही आहे की सगळ्यांना सहआरोपी करा. आरोपपत्रात अनेक गोष्टी आलेल्या नाहीत” असं अंजली दमानिया म्हणाल्या. “जे पोलीस अधिकारी होते, ज्यांनी प्रचंड मदत केली, त्यांचं कोणाचही नाव त्यामध्ये नाही. कोणाचही स्टेटमेंट चार्जशीटमध्ये नाही, 200 लोकांची यादी आहे. राजेश पाटील, महाजन, गीते म्हणून अधिकारी होते, जे खंडणीच्या दिवशी उपस्थित होते, त्यांचं कोणाचही स्टेटमेंट, नाव यामध्ये नाही. गीतेनी या टोळीला मदत केली होती. त्यांना पूर्ण कल्पना होती, संतोष देशमुख यांना उचलून नेलय, तरी सुद्धा मदत केली. हे सगळे सहआरोपी झाले पाहिजेत. माझी मागणी आहे धनंजय मुंडे, सारंग आंधळे, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, बालाजी तांदळे, डॉ. वायबसे आणि गीते अशा दहा जणांना सहआरोपी करा” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का?’

“धनंजय मुंडे यांना सगळी कल्पना आहे. त्यांना माहिती आहे. अवादा कंपनीची बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती, तिथे हे सगळे हजर होते. दोन पोलीस अधिकारी होते. ही सगळी माहिती आहे. पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? जर मुख्यमंत्री विधान करत असतील की, माहिती मिळेल तेव्हा करु, पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही. चौकशी झाली नाही. सीडीआर त्यांचे सीसीटीव्ही स्टेटमेंट, टॉवर लोकेशन येणारच नाही, तपास होणार कसा?” असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला.

Follow Us