मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही, तेच माझ्याकडे… त्यांना यावंच लागतं… ‘या’ नेत्याचे मोठे विधान

आता निधी परत जात आहे. किती वेळा कोर्टात जायचे. फारकत घ्यायलाही कोर्टात जायचे आणि पैसे मागायला देखील कोर्टात जायचे अशी वेळ आली आहे. मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही. तेच माझ्याकडे येतात. त्यांना यावंच लागतं...

मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही, तेच माझ्याकडे... त्यांना यावंच लागतं... या नेत्याचे मोठे विधान
CM EKNATH SHINDE
Mahesh Pawar | Updated on: Jun 04, 2023 | 9:24 PM

नाशिक : नाशिकच्या सुरगाणा येथे शेतकरी मेळावा सुरु आहे. या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादीच्या दिगज्ज नेते उपस्थित आहेत. यावेळी व्यासपीठावरून बोलताना अनेक नेत्यांनी राज्यसरकारच्या कारभारावर टीका केलीय. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ‘फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’ अशी उपमा देत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. तर अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर कडक शब्दात टीकेची झोड उठवलीय. या सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. हेलिकॉप्टरमध्ये फिरण्यासाठी एक टक्का मागितला जातो, असा आरोप अजित पवार यांनी केला.

अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. आम्ही पहाटे गेलो तेव्हा ते उपमुख्यमंत्री झाले. पण आता त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. बरेच लोकं म्हणतात की, दादा गरम आहे. त्यांना भेटायचं म्हणजे धाक वाटतो. पण, दादा म्हणजे शिस्त आहे. कधी कधी असं वाटतं की, दादा याहीपेक्षा स्ट्रिक्ट झाले पाहिजे. दादा उपमुख्यमंत्री असताना आम्ही रविवारीदेखील मीटिंग केल्या आहे, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही. तेच माझ्याकडे येतात. त्यांना यावंच लागतं असा टोलाही झिरवाळ यांनी लगावला. आता निधी परत जात आहे. किती वेळा कोर्टात जायचे. फारकत घ्यायलाही कोर्टात जायचे आणि पैसे मागायला देखील कोर्टात जायचे अशी वेळ आली आहे अशी टीका त्यांनी राज्यसरकारवर केली.

सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही या तालुक्याला काहीच मिळाले नाही याचं शल्य आम्हाला आहे अशी खंत व्यक्त केली. सुरगाणा तालुका दहशतीच्या वावरात आहे. लोकं तुम्हाला मोर्चाला घेऊन जातील. शिळ्या भाकरीचे खाऊ घालतील. पण तुम्हाला काही मिळणार नाही. आता राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री इथे येऊन गेले. पण काहीही मदत मिळाली नाही. हे सरकार काही करू शकत नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करतात त्यांनाच माहीत – अजित पवार

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आले त्या काळात या भागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. या भागासाठी 422 कोटी रुपये निधी दिला. जनतेने साथ दिल्यानंतर एखाद्या भागाचा विकास होतो. आंदोलन केल्यानंतर पदरात काही पडलं पाहिजे. फक्त ‘चलो मुंबई’ करून उपयोग नाही. या सरकारला 11 महिने झाले, काही दिलं का? शेतकऱ्यांच्या पिकाची काय अवस्था झालीय. आम्ही अनुदान द्या म्हणून आंदोलन केलं. पण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करतात हे त्यांचं त्यांनाच माहीत असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

सरकार फक्त मिरवण्यासाठी आहे का ?

शेतकरी भाजीपाला पिकवून देतो आणि तुम्ही त्याला अडचणीच्या काळात मदत करत नाही. सकाळी पाऊस येईल की काय, अशी शंका होती. पण, निसर्गाने साथ दिली. आज नाशिक जिल्ह्यात काही भागांत प्रचंड पाऊस पडतो, काही भागांत पाण्यासाठी वणवण आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही, खावटी कर्ज मिळत नाही.. मग सरकार फक्त मिरवण्यासाठी आहे का ? असा सवाल अजित पवार यांनी केला.

जाती, धर्मात अंतर वाढविण्याचे काम सुरू

सरकार येत असतात, जात असतात. हे काय ताम्रपट घेऊन आले का? मागच्या काळातील कामे सरकार थांबवत आहे. कोरोना काळात अर्थ मंत्रालयात सांभाळत असताना अडचण यायची. सगळ्यांचे पगार वेळेवर करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागायची. त्याकाळात महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, कोरोना मुक्त झाला पाहिजे, याकडे आम्ही लक्ष दिले. पण, आजच्या काळात महापुरुषांना वाटेल ते बोलले जात आहे. आज जाती, धर्मात अंतर वाढविण्याचे काम सुरू आहे.

लोकं नाकारतील याची भीती वाटते

नुसतंच निर्णय गतिमान आणि कारभार ढिसाळ असे सध्या सुरू आहे. जाहिरातीसाठी 100 कोटी खर्च केले जातात. आम्ही सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावा. पण त्याना निवडणुका घेतल्या की लोकं नाकारतील याची भीती वाटते. कसबामध्ये आपला उमेदवार निवडून आला. यांनी फोडाफोडी केली, गद्दारी केली. काय कारण होतं, कुणाला घाबरून गेले? कर्नाटक मध्ये जे आमदार भाजपमध्ये गेले, त्यांना भाजपने तिकीट दिलं आणि ते बहुतेक पडले. तीच वेळ महाराष्ट्रातही येईल. यांना पाहिलं की आता लहान लहान मुले देखील ‘पन्नास खोके, एकदम ओके’ म्हणतात असे ते म्हणाले.

भाषणात मुख्यमंत्री झाला पाहिजे, असे म्हणून मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा लागतो. त्यासाठी आपल्याला आपली ताकद वाढवावी लागेल. ज्या ठिकाणी ज्याची ताकद आहे, त्याठिकाणी त्याचा उमेदवार उभा राहील. कार्यकर्ते इथूनच तयार होत असतात. लोकांपर्यंत योजना पोहचतात, असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

Follow Us