…अन् बावनकुळेंनी मानले शिंदेंचे आभार, मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी बातमी, घडामोडींना वेग

काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली, त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

...अन् बावनकुळेंनी मानले शिंदेंचे आभार, मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी बातमी, घडामोडींना वेग
| Updated on: Nov 27, 2024 | 5:04 PM

काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रिपदाचं घोडं कुठेही आडलेलं नाही, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मी त्यांना सांगितलं की निर्णय घेताना माझी अडचण आहे असं कुठेही वाटू देऊ नका, केंद्रीय नेतृत्व म्हणून जसा तुमचा निर्णय भाजपला मान्य असेल तसा तो आम्हालाही मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

महायुतीचे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. कालपासून विरोधी पक्षातील लोकं हे शिंदे यांच्याबद्दल ते नाराज आहेत, अशा पद्धतीच्या वावड्या उठवत होते. एकनाथ शिंदे सारख्या कर्तबागर व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. पण शिंदे यांनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्रातील जनतेला आणि राज्यातील सर्व जनतेला पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सांगितली.

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह तसेच केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेईल, त्याला पूर्ण समर्थन राहील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुती म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. त्यामुळे विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या, त्या वाफाच राहिल्या. शिंदे यांचं राज्याच्या विकासासाठी मोठं योगदान आहे. आम्ही आधीपासून त्यांचं काम पाहत आलो  आहोत. फडणवीस मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी चांगलं काम केलं. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो. आमचे तिन्ही नेते सांगायचे आमची लढाई मुख्यमंत्रिपदासाठी नाही. महाविकास आघाडीत तर 8 मुख्यमंत्री तयार झाले होते. महाविकास आघाडी ही मुख्यमंत्रिपदासाठी लढत होती. तर आम्ही जनतेच्या विकासासाठी लढत होतो. त्यामुळे जनतेने आम्हाला स्वीकारलं, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us