फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटीत काय घडलं? सुनील प्रभूंनी सगळंच सांगितलं

"देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबद्दल आपल्याला माहिती आहे, पण संपूर्ण देशाला ठाकरे अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे ही सगळी मंडळी शाब्दिक कोट्या करतात, विनोद करतात. त्यामुळे निश्चितच तशी चर्चा झाली", अशी आतली बातमी सुनील प्रभू यांनी दिली.

फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटीत काय घडलं? सुनील प्रभूंनी सगळंच सांगितलं
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
Chetan Patil | Updated on: Dec 17, 2024 | 8:41 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नागपुरात विधान भवनात मुख्यमंत्र्यांच्या दालनात भेट झाली. उद्धव ठाकरे हे स्वत: देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीवेळी नेमकं काय घडलं? याबाबतची सविस्तर माहिती ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी दिली आहे. “महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे. या राज्याच्या राजकारणात सुसंस्कृत राजकारणी म्हणून सर्व लोक बघतात. मधल्या काळात जे वातावरण तयार झालं होतं ते महाराष्ट्राला शोभणीय नव्हतं. आज सार्वत्रिक निवडणुकीनंतर नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नागपूर अधिवेशनात होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना पुढील पाच वर्षांच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा द्याव्यात या उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली”, असं सुनील प्रभू यांनी सांगितलं.

“विरोधी पक्ष म्हणून आमची संख्या कमी असली तरी विरोधी पक्ष म्हणून सरकारला जे सांगण्याची वेळ येतील ते स्पष्टपणे सांगू हे तितक्याच तत्परतेने आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद उत्तम होता. विधानसभेच्या आवारातील त्यांची भेट होती. या भेटीमध्ये विधानसभेचं कामकाज, येणाऱ्या काळात सरकारच्या वतीने आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्याबाबत चर्चा, या सर्व गोष्टींवर खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्यात बोलणं झालं”, असं सुनील प्रभू यांनी सांगितलं.

“देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाबद्दल आपल्याला माहिती आहे, पण संपूर्ण देशाला ठाकरे अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे ही सगळी मंडळी शाब्दिक कोट्या करतात, विनोद करतात. त्यामुळे निश्चितच तशी चर्चा झाली. खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली आणि राजकारणाच्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा देणं हा एकमेव उद्देश होता. सुसंस्कृत महाराष्ट्राला जे अभिप्रेत आहे त्या दृष्टीने चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली.

राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर सुनील प्रभू काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीदेखील भेट घेतली. या भेटीवरही सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली. “मागच्या वेळच्या घटनाबाह्य सरकारच्या विरोधात न्यायालयात खटला सुरु आहे. त्याबाबत न्यायालयात निर्णयदेखील होईल. पण कोर्टाने दिलेल्या सूचनेनंतर ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला तो भेदभाव करणारा होता. हे आम्ही त्यांना त्यावेळीदेखील तोंडावर सांगितलं होतं. ठीक आहे, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. त्यांना बहुमत मिळालं. ते बहुमत कशामुळे झाले याबाबत 13 कोटी जनता उद्रेक करत आहे. हा भाग वेगळा आहे. पण आज बहुमत मिळून अध्यक्ष पदाचा पदभार त्यंनी स्वीकारल्यानंतर मोठ्या दिलाने त्यांना अभिनंदन करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. विरोधी पक्षनेत्याची निवड ही नियमानुसार, प्रथा परंपरेनुसार, सगळ्या गोष्टी पडताळून अध्यक्ष त्याबाबतचा निर्णय घेतील. आजच्या भेटीचा आणि अध्यक्षांचा विरोधी पक्षनेत्याच्या कृतीबाबत कोणताही तीळमात्र संबंध नव्हता”, असं स्पष्टीकरण सुनील प्रभू यांनी दिलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us