Supriya Sule: आंब्याच्या झाडालाच दगड मारतात बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का?, सुप्रिया सुळेंचा राज यांना टोला

Supriya Sule: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. त्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

Supriya Sule: आंब्याच्या झाडालाच दगड मारतात बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का?, सुप्रिया सुळेंचा राज यांना टोला
आंब्याच्या झाडालाच दगड मारतात बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का?, सुप्रिया सुळेंचा राज यांना टोला
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 11:54 AM

ठाणे: आंब्याच्या झाडालाच दगड मारतात बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का?, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)  यांना लगावला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेतून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला होता. पवार जाती जातीत भांडण लावतात. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून राज्यात जातीवादाला खतपाणी मिळाली, असा आरोपही राज यांनी केला होता. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी हा टोला लगावला. सुप्रिया सुळे या मीडियाशी संवाद साधत होत्या. आमच्यावर यशंवतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या कृतीत नम्रता होती. सहनशीलता होती. अल्टिमेटम हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हता. त्यामुळे या शब्दाचा मला अभ्यास नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून चीनच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चीनचा विषय महत्त्वाचा आहे. हा विषय भारताने गांभीर्याने घेण्याचा आहे. संसदेत मी वारंवार युद्धावर मी बोलत होते. युद्ध कोणी जिंकत नाही. युद्धामुळे विधवा होतात. युद्ध कोणत्याही प्रश्नाचा पर्याय नाही, हे मी संसदेत वारंवार बोलत होते. आमचे विचार होते ते मोदींनी मांडले. इंग्रजीत जिंगोइझम म्हणतात. 56 इंचची भाषा वगैरे भाषणा पुरतं छान असते. एक माहौल असतो त्यावेळी ते बोलत होते. पण वास्तवापासून दूर असतात, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

आनंद वाटला पाहिजे

माझ्या लोकसभा मतदारसंघात सुंदर जत्रा, यात्रा सुरू आहेत. बैलगाडीची शर्यत सुरू आहे. ईद, अक्षय तृत्तीया, लग्न, मूंज होत आहे. आपण आंबेडकर जयंती साजरी केली. आपल्या देशात रोज साजरं करण्यासारखं आहे. त्याचा आनंद वाटला पाहिजे, असंही ते म्हणाले.

मलिकांची चिंता

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. त्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. नवाब मलिकांची आम्हाला चिंता आहे. त्यांना रुग्णालयाची गरज आहे. चांगल्या डॉक्टरची गरज आहे. त्यासाठी आम्ही कोर्टात प्रयत्न करत आहोत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांची देखरेख करत आहेत. मलिक साहेबांना लवकरात लवकर बरं करा असं आमचं म्हणणं आहे, असंही त्या म्हणाल्या.