Supriya Sule : जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरुन सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

Supriya Sule : "निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट वाटलं असेल. निर्मलाजी सांगतात कॅश पासून दूर राहा. डिजीटल व्यवहार स्वीकारा. नोटबंदी झाली त्याचं काय झालं?. आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाने ब्लॅकमनी हद्दपार करण्यासाठी नोटबंदी आणली"

Supriya Sule : जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरुन सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule-Jayant Patil
| Updated on: Jul 14, 2025 | 11:11 AM

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल सोलापूरमध्ये हल्ला झाला. त्यावर आज भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी, या हल्ल्याचा भाजपशी संबंध नसल्याच सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे यावर बोलल्या आहेत. “मला असं वाटतं, तुमची जी विधान भवनमध्ये टीम आहे, त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा. कारण गृहखातं त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे रिपोर्ट असेल तो कुठल्या पक्षातला आहे. भाजपचे 10 कोटी सदस्य आहेत. डेटा बेसवरुन कळेल तो कार्यकर्ता आहे की नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जंयत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला का? त्यांच्या राजीनाम्यावरुन संभ्रमाची स्थिती आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सुप्रिया सुळे बोलल्या की, “त्यांचा राजीनामा मी पाहिलेला नाही. वाचलेला नाही. तुमच्या चॅनलला बातमी देणारा जो सूत्र आहे, त्या सूत्राने दिलेली बातमी विचार करुन लावा. हा सूत्र खात्रीलायक नाही. शिवाय तुमच्या विश्वाहर्तेचा प्रश्न आहे” “मी अशा कुठल्या राजीनाम्याबद्दल ऐकलेलं नाही. वाचलेलं नाही. उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात कळेल. मी जयंत पाटलांशी रोज बोलते. जी घटना आमच्या आयुष्यात झाली नाही, त्या बद्दल काय बोलणार?” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

प्रदेशाध्यक्ष बदलणार का?

प्रदेशाध्यक्ष बदलणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. “राजकीय पक्ष, संघटनेत जी जबाबदारी पडेल, तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयार आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी संघर्ष केलाय. कितीही आव्हान आली तरी कालही, आजही आणि उद्याही संघर्ष करायला तयार असतात” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राजीनाम्याची चर्चा विरोधकांनी घडवून आणली का? यावर “ज्या गोष्टीत वास्तव नाही, त्यात एवढा वेळ का घालवायचा?. प्रविणदादा, महागाई एवढे विषय आहेत” असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं. महाराष्ट्रात एका मंत्र्याच्या घरी बॅगमध्ये कॅश दिसली, त्यावर सुप्रिया सुळे व्यक्त झाल्या.

‘निर्मलाताई, पंतप्रधान मोदींना खूप वाईट वाटलं असेल’

“निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट वाटलं असेल. निर्मलाजी सांगतात कॅश पासून दूर राहा. डिजीटल व्यवहार स्वीकारा. नोटबंदी झाली त्याचं काय झालं?. आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाने ब्लॅकमनी हद्दपार करण्यासाठी नोटबंदी आणली. त्या नोटबंदीचा पुढे काय झालं?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. “मी दिल्लीला जाईन, तेव्हा हा प्रश्न विचारणार आहे. महाराष्ट्रातील चॅनल्सनी एका मंत्र्याच्या घरी बॅगमध्ये कॅश भरलेली असल्याच दाखवलं. पैशाचे व्यवहार कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असताना तिथे राज्यात कॅश सापडते हे चिंताजनक आहे. मी हा विषय अर्थमंत्रालयाकडे उपस्थित करणार आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.