ठाणे शहराला भातसा आणि बारवीतून 70 दशलक्ष लिटर पाणी देणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय; लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी

| Updated on: Jul 16, 2022 | 4:26 PM

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 485 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी पडतो. हे लक्षात घेऊन बारवी आणि भातसा धरणांतून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

ठाणे शहराला भातसा आणि बारवीतून 70 दशलक्ष लिटर पाणी देणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय; लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी
Follow us on

ठाणेः ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा (Bhatsa Dam) आणि बारवी धरणातून (Baravi Dam) 50 दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोट्यातील 20 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेचा आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 485 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी पडतो. हे लक्षात घेऊन बारवी आणि भातसा धरणांतून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर या धरणातून शहराला100 दशलक्ष लिटर पाणी मिळावे असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला होता.

पुढील कार्यवाही तात्काळ करा

जलसंपदा विभागाने अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कार्यवाही तात्काळ करावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. ठाणे मनपाबरोबर कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत जलसंपदा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

धरणांच्या कामांना गती

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. भातसा, नामपाडा, पोवाले, काळू आणि शाई या धरणांच्या कामाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. त्यासोबतच या धरणांच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.