‘पालकमंत्र्यांनी रस्त्यांच्या 472 कोटींची फाईल मंजूर न करणे हे निव्वळ राजकारण’, आमदार रविंद्र चव्हाणांचा गंभीर आरोप

"कल्याण डोंबिवली ही पालकमंत्र्यांच्या मुलाची खासदारकी आहे. तरीदेखील फाईल पेंडिग ठेवली जात असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे", असं आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत.

पालकमंत्र्यांनी रस्त्यांच्या 472 कोटींची फाईल मंजूर न करणे हे निव्वळ राजकारण, आमदार रविंद्र चव्हाणांचा गंभीर आरोप
भाजप आमदार रविंद्र चव्हाण
Reporter Amjad Khan | Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 30, 2021 | 4:44 PM

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले आहेत. यापूर्वी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीत सिमेंट काँन्क्रीटीकरण करण्यासाठी 472 कोटी मंजूर केले होते. ही फाईल निव्वळ राजकारण म्हणून पेंडिगला ठेवली जात आहे, असा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. “या खात्याचे मंत्री पालकमंत्री आहेत. कल्याण डोंबिवली ही त्यांच्या मुलाची खासदारकी आहे. तरीदेखील फाईल पेंडिग ठेवली जात असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे”, असं आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत.

‘8 कोटींची प्रोव्हीजन 15 कोटींवर गेली’

“रस्त्यावरील खड्डे भरणे हा विषय प्रशासन म्हणून आयुक्त अत्यंत वाईट पद्धतीने काम करीत आहेत. पूर्वीचा काळ आठवतो. ज्यावेळी आम्ही नगरसेवक म्हणून काम करीत होतो. खड्डे भरण्याचे टेंडर हे मे महिन्याच्या अगोदर वर्क ऑर्डर दिले जात होते. त्यावेळी पावसाच्याआधी आणि पावसाळ्यानंतर अशा दोन्ही वेळेस खड्डे भरण्याची प्रक्रिया केली जात होती. त्यावेळी 8 कोटी रुपयांची प्रोव्हीजन असायची. ही प्रोव्हीजन आज 15 कोटींची झाली आहे. असे असताना सुद्धा रस्त्यावर खड्डे असणे अतिशय चुकीचे आहे”, असं रविंद्र चव्हाण म्हणाले.

‘पालकमंत्र्यांचे हेतू पुरस्सर दुर्लक्ष’

“काही वर्षांअगोदर खड्ड्यांमुळे अनेक जण मृत्यूमुखी पडले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआर रिजनमध्ये काँन्क्रीटीकरणाचे रस्ते झाले पाहिजे. त्यामुळे रस्त्यांना सुरुवात झाली. त्यापैकी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांना 472 कोटी रुपयांचा निधी एमएमआरडीएकडून मंजूर करण्याच्या दिशेने पूर्ण प्रक्रिया मंजूर झाली. दोन वर्षे झाली ही फाईल त्याठिकाणी पडून आहे. पालकमंत्री या खात्याचे मंत्री आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका त्यांच्या मुलाची खासदारकी म्हणून सुद्धा आहे. असे असताना सुद्धा या सर्व गोष्टीकडे हेतू पुरस्सर दुर्लक्ष केले जाते”, असा आरोप चव्हाण यांनी केला.

‘फक्त राजकारणासाठी 472 कोटींचा निधी पेडिंग ठेवला’

“472 कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवलीस मिळाला. तर हा प्रश्न मार्गी लागेल. आम्ही भाजपचे सर्व नगरसेवकांनी अंतर्गत रस्ते काँन्क्रीटीकरणासाठी 1 कोटींचा निधी दिला होता. मात्र मु्ख्य रस्त्यासाठी मंजूर झालेला 472 कोटींचा निधी निव्वळ राजकारण म्हणून तसाच पेंडिग ठेवत असेल तर याचा परिमाण सर्व सामान्य नागरीकांना होतोय. त्वरीत जी फाईल एमएमआरडीएमध्ये आहे. तिला मंजूरी देणे ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे”, असंदेखील चव्हाण म्हणाले.

कल्याण पूर्वेत भाजप कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजप नेते विनोद तावडे, भाजप नेते रविंद्र चव्हाण, जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, मनोज राज हे उपस्थित होते. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, रस्त्यावर 10 फूट लांबीचे खड्डे, वाहन चालकांची कसरत

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us