केडीएमसीच्या प्रभाग रचनेत घोळात घोळ, उल्हासनगरचा काही भाग दाखवला केडीएमसीत; आमदार गायकवाड म्हणतात…

| Updated on: Feb 14, 2022 | 3:37 PM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीकडे मतदारच नव्हे तर नगरसेवकही डोळे लावून असतानाच कल्याण-डोंबिवलीतील प्रभाग रचनेतील घोळात घोळ समोर आला. केडीएमसी प्रभाग रचनेत इतका घोळ झालाय की उल्हासनगर महापालिकेचा काही भाग सुद्धा केडीएमसीच्या प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे.

केडीएमसीच्या प्रभाग रचनेत घोळात घोळ, उल्हासनगरचा काही भाग दाखवला केडीएमसीत; आमदार गायकवाड म्हणतात...
केडीएमसीच्या प्रभाग रचनेत घोळात घोळ, उल्हासनगरचा काही भाग दाखवला केडीएमसीत
Follow us on

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (kdmc) निवडणुकीकडे मतदारच नव्हे तर नगरसेवकही डोळे लावून असतानाच कल्याण-डोंबिवलीतील प्रभाग रचनेतील घोळात घोळ समोर आला. केडीएमसी प्रभाग रचनेत इतका घोळ झालाय की उल्हासनगर महापालिकेचा (ulhasnagar corporation) काही भाग सुद्धा केडीएमसीच्या प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग रचना सुरू कुठून व्हायला पाहिजे ते सुद्धा बदलले गेले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रभाग रचनेच्या या घोळावरून भाजपचे आमदार गणपत गायकवाड (ganpat gaikawad) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ता आली तर सूर्य कूठूनही उगवू शकतो अशी मला खात्री वाटते, असा टोला आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेला लगावला आहे. इतकेच नव्हे तर जे नगरसेवक जाणार आहेत. त्यांचे आम्हाला काहीच दु:ख नाही. सक्षम कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, असंही गायकवाड यांनी सांगितलं.

कल्याण डोंबिवली महापालिकेची प्रभाग रचना 1 फेब्रुवारी रोजी जाहिर झाली. पालिका क्षेत्रात एकूण 44 पॅनल आणि 133 प्रभाग आहे. निवडणूक आयोगाने हरकती सूचनांसाठी 14 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. त्याचा आजचा शेवटचा दिवस होता. डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रभाग रचनेवरुन आक्षेप घेतल्यानंतर कल्याण पूर्व विभागाचे भाजप आमदार गणपत गायकवाड, शहराध्यक्ष संजय मोरे, अभिमन्यू गायकवाड यांच्या सोबत आज महापालिका मुख्यालयातील निडणूक कार्यालयात येऊन प्रभाग रचनेसंदर्भात हरकती घेतल्या. गायकवाड यांनी आठ पॅनलमध्ये चूकीच्या पद्धतीने रचना केली गेली असल्याची मुख्य हरकत घेतली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे उल्हासनगरातील काही भाग केडीएमसीत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग रचना करणारे महापालिका अधिकारी पालिका क्षेत्रात फिरले सुद्धा नाही असे वाटते. शिवसेनेला कसे जास्त मतदान होईल या दृष्टीने प्रभाग रचना करण्यात आली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आलाय.

प्रभाग रचनेची दिशाही बदलली

प्रभाग रचना कुठून होणार याची दिशा सुद्धा बदलण्यात आली आहे. टिटवाळापासून सुरु होणारा प्रभाग थेट उंबर्डेपासून सुरु केला आहे. म्हणजेच सत्ता असली तर सूर्य कुठूनपण उगवू शकतो अशी मला खात्री वाटते, अशी टीका गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे.

जे गेले ते कधीच आमचे नव्हते

भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. काही दिवसापूर्वीच कल्याण पूर्व भागातील विशाल पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरही गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जे नगरसेवक गेले आहेत, ते आमचे कधीच नव्हते. निवडणुकी पूरते हातापाया पडून आले होते. जे गेले आणि जे जाणार आहेत त्यांचे आम्हाला काही एक दु:ख नाही. आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि ते पक्षासाठी काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

मुलीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आईच्या जीवावर, पालघरमध्ये शेजारी कुटुंबांत हाणामारी, 46 वर्षीय महिलेचा मृत्यू