ठाण्यात ठेकेदारांचे बंड; बिले चुकती करा, नाही तर काम बंद करू; ठेकेदारांचा इशारा

| Updated on: Sep 21, 2021 | 6:21 PM

ठाणे पालिका क्षेत्रात सुरू असलेली महत्वाची कामे बंद करण्याचा इशारा पुन्हा एकदा ठाण्यातील ठेकेदारांनी दिला आहे. किमान जुन्या कामाची बिले तरी ठाणे महापालिकेने काढावी अशी मागणी 180 ठेकेदारांनी केली आहे. (contractor warn thane municipal corporation to stop work in thane)

ठाण्यात ठेकेदारांचे बंड; बिले चुकती करा, नाही तर काम बंद करू; ठेकेदारांचा इशारा
thane municipal corporation
Follow us on

ठाणे: ठाणे पालिका क्षेत्रात सुरू असलेली महत्वाची कामे बंद करण्याचा इशारा पुन्हा एकदा ठाण्यातील ठेकेदारांनी दिला आहे. किमान जुन्या कामाची बिले तरी ठाणे महापालिकेने काढावी अशी मागणी 180 ठेकेदारांनी केली आहे. जवळपास 700 ते 800 कोटींची थकबाकी ठाणे महापालिकेकडे असून कुटुंबं चालवणं देखील कठीण झाले असल्याने ठेकेदारांनी आत्मदहनाचा इशारा देखील प्रशासनाला दिला आहे. (contractor warn thane municipal corporation to stop work in thane)

ठाणे महापालिकेची आर्थिकस्थिती बिकट झाल्याने बिले स्वीकारणेच ठाणे महापालिकेने बंद केले आहे. शहरात ठेकेदारांच्या माध्यमातून अनेक महत्वाची कामे सुरू असून केलेल्या कामांची बिलेच मिळत नसल्याने कामगारांना पगार देण्यासाठीही पैसे नसल्याने काम करणे देखील कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच बिले निघत नसल्याने ठेकेदारांनी पालिका मुख्यालयात आंदोलन केले होते. मात्र अद्यापही बिल अदा न झाल्याने आज पुन्हा ठेकेदारांनी आंदोलन करून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान ठेकेदारांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली असून माळवी यांनी आयुक्तां सोबत यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. ठेकेदारांनी खरंच कामे बंद केली तर शहरातील परिस्थिती मात्र बिकट होण्याची चिन्हे आहेत.

पुलाला तडे, मनसेचं आंदोलन

दरम्यान, मनसेने ठाण्यातील कोपरीमधील नवीन पुलाला तडे गेले आहेत. या पूलाला काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचं सांगत मनसेने याच पुलावर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आधी मनसे नेत्यांनी या पुलाची पाहणी केली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी देत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या आंदोलनात महिला आंदोलक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. या पुलाला तडे गेल्याने ठाण्याहून मुंबईला जाणं कठिण झालं आहे. कारण या पुलाची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्रवासी आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास कसा करतील? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच या पुलाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आधी टाळमृदुंग आंदोलन

नवीन बांधलेल्या कोपरी ब्रिज वापरण्यापूर्वीच तडे गेल्याचे निदर्शनास आले असताना मनसेने या आधी एमएमआरडीए प्रशासन आणि राज्य सरकारच्या विरोधात टाळ मृदुंग, ढोलकी वाजवत आंदोलन केल होते. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोपरी पुलाला तडे गेल्याने हा पूल धोकादायक झाल्याचे मनसेने निदर्शनात आणले होते. या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मनसेने केली आहे. याच कोपरी पुलाचे युतीच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेले होते. तर आता या पुलाला आणखी किती वेळ खुला होण्यासाठी लागणार हेच पाहणे गरजेचे आहे मात्र सद्या तरी तडे गेलेल्या ठिकाणी काम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. (contractor warn thane municipal corporation to stop work in thane)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: खड्डे दुरुस्त न करता टोल वसुली; मनसेने भिवंडी-ठाणे रस्त्यावरील टोल नाका फोडला

दोन महिन्यांचं वीजबिल भरलं नाही, वीज कापताच पोलिसाची महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण

नाकाबंदीवेळी बाईकस्वाराच्या डोक्यावर पोलिसाची काठीने मारहाण, युवक गंभीर जखमी

(contractor warn thane municipal corporation to stop work in thane)