डोंबिवली (ठाणे) : काँक्रीटीकरण रस्त्याच्या भूमीपूजना दरम्यान जागा मालकाने भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजप नगरसेवकासोबत जोरदार वाद घातला. खाजगी जागेवर सरकारी भूमीपूजन कसे काय होऊ शकते? असा प्रश्न जागा मालकाने उपस्थित केला. त्यानंतर संतापलेल्या आमदारांनी महापालिकेच्या परवानगी शिवाय हे काम केले जात नाही. महापालिकेस जाऊन विचारा या शब्दात उत्तर दिले. मात्र या वादामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर भाजप नगरसेविका वृषाली रंजित जोशी यांच्या नगरसेवक निधीतून एका कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक रंजीत जोशी आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण सह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आमदारांनी भूमीपूजनास सुरु करणार होते.
यावेळी तेथील स्थानिक रहिवासी मधूकर पाटील यांनी आमदार रविंद्र चव्हाण आणि माजी नगरसेवक रंजीत जोशी यांच्यासोबत हुज्जत घालत हरकत घेतली. ही जागा माझी आहे. त्यावर भूमीपूजन कसे काय करता? असा सवाल उपस्थित करीत जवळपास 20 मिनीटे आमदार आणि नगरसेवकासोबत पाटील यांनी हुज्जत घातली.
यावेळी आमदारांनी थेट जागामालक पाटील यांना खडेबोल सूनावले. मी ऐकून घेत आहे. याचा अर्थ असा नाही की, काही पण बोला. महापालिकेच्या परवानगी शिवाय हे काम केले जात नाही. महापालिकेने टेंडर काढले आहे. काही बोलायचे असल्यास महापालिकेस जाऊन विचारा. नागरीकांच्या हितासाठी आम्ही काम करीतच राहणार, असे त्यांनी सुनावले.
“माझ्या वैयक्तिक जागेत रोड घेऊन जायचा नाही. रोड आहे, लोक येतात-जातात त्यांना आम्ही कधी अडवलेलं नाही. आमची प्रॉपर्टी आहे. आम्ही जेव्हा जागा डेव्हलोप करु तेव्हा रोड बनवूच. पण यांचा हट्ट कशामुळे? याबाबत हायकोर्टात केस पेंडींग आहे”, अशी प्रतिक्रिया जागा मालकाने दिली.
जागा मालकापेक्षा तिथे राहत असलेल्या नागरिकांची चांगल्या रस्त्याची मागणी आहे. त्या ठिकाणी रहदारीसाठी चांगला रस्त्या निर्माण करुन देण्याची जबाबदारी त्या भागातील लोकप्रतिनिधीची आहे. महापालिकेने, शासनाने त्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे, अशी भूमिका आमदार रविंद्र चव्हाण यांनी मांडली. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेत रणजित जोशी आणि माजी नगरसेविका ऋषाली जोशी यांच्या प्रभागामध्ये गेली तीस-चाळीस वर्ष ज्या रस्त्याच्या कामाची आवश्यकता होती, नागरिकांची मागणी होती त्या कामाचं आज उद्घाटन झालं आहे. त्या सगळ्या विषयांमध्ये नागरिकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून नागरिकांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. अनेक ठिकाणी असे प्रकल्प सुरु होत आहेत. येण्या काळातही अशा प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल, असंही रविंद्र चव्हाण म्हणाले.
“जवळपास पाच ते सहा सोसायट्या त्या रोडमध्ये येत्या. ती आधीपासूनची पायवाट आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासूनचा रस्ता आहे. त्यांचा प्लॉट त्याच्या बाजूला आहे. त्यांनी प्लॉटला रस्ता दिला नाही तर त्यांच्या प्लॉटचा पुढे विकास करु शकत नाहीत. हे मी त्यांना समजावून सांगितलं. तुम्ही रोडसाठी जागा दिली तर रोडचा टीडीआर मिळेल, असं मी समजावून सांगितलं. पण ते विरोधक असल्यामुळे नेहमीच रस्त्याच्या विकासाला अडथळा आणत होते. आपण महापालिकेत रितसर रस्ता मंजूर करुन घेतला. आता त्याची वर्कऑर्डर काढून घेतली. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी तो रोड व्यवस्थित करत आहोत. लोकांच्या हितासाठी तो रोड आपण बनवत आहोत”, अशी भूमिका स्थानिक माजी नगरसेवक रंजीत जोशी यांनी मांडली.
हेही वाचा :
अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पैशांची मागणी; काँग्रेसच्या नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
दसरा सण मोठा…! झेंडूला सोन्याचा भाव, कल्याण फुलबाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी