naxal encounter: गडचिरोलीत नेमकं काय घडलं?; एकनाथ शिंदे म्हणाले, 10 तास सुरू होती चकमक

| Updated on: Nov 14, 2021 | 4:33 PM

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक 9 ते 10 तास सुरू होती. या चकमकीत काही पोलीस जखमी झाले होते.

naxal encounter: गडचिरोलीत नेमकं काय घडलं?; एकनाथ शिंदे म्हणाले, 10 तास सुरू होती चकमक
eknath shinde
Follow us on

ठाणे: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक 9 ते 10 तास सुरू होती. या चकमकीत काही पोलीस जखमी झाले होते. मात्र, त्याही अवस्थेत त्यांनी झुंज देत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली. पोलीस आणि सी-16 टीमने 26 नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर केला. ही गेल्या वर्षभरातील मोठी कारवाई आहे. देशातीलही ही मोठी कारवाई आहे. ही कारवाई गडचिरोली एसपी अंकित गोयल. समीर शेख आणि सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या कारवाईत चार पोलीस जखमी झाले आहेत. हे पोली ऑरेंज सिटी नागपूरला अॅडमिट आहेत. मी काल डॉक्टरांशी बोललो. दोन पोलिसांशीही बोललो. त्यांच्या उपचाराबाबतच्या सूचना दिल्या आहेत. उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मी या पोलिसांना जाऊन स्वत: भेटणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

जवान जखमी होऊनही चकमक सुरू होती. 9 ते 10 तास चकमक सुरू होती. पोलिसांची टीम गस्त घालत होती. तेव्हा नक्षल्यांनी समोरून फायरिंग केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी जीवाची बाजी लावून प्रत्युत्तर दिलं. त्यात 26 नक्षलवादी मारले गेले. त्यांच्यावर खूप बक्षीसं होती. त्यांनी अनेकांची हत्या केली होती. ही कालची विशेष कारवाई होती. या कारवाईची इतर नक्षलग्रस्त राज्यांनीही दखल घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं.

तेलतुंबडेंचा खातमा हा इतर नक्षल्यांना धक्का

या कारवाईत जहाल नक्षलवादी मिलिंद तुंबडेला ठार करण्यात आलं आहे. तो नक्षल्यांचा कमांडर होता. महाराष्ट्रच नव्हे तर आंध्रप्रदेश, तेलंगनाचीही त्याच्यावर जबाबदारी होती. तो तीन लेअरच्या सुरक्षा कवचमध्ये फिरत होता. असं असतानाही गडचिरोली पोलिसांनी त्याचा खातमा केला. त्याच्यावर राज्यात 50 लाखापेक्षा अधिक बक्षीस होतं. इतर राज्यातही त्याच्यावर बक्षीस होतं. तेलतुंबडेचा एन्काऊंटर हा इतर राज्यातील नक्षल्यांनाही धक्का आहे, असं सांगतानाच गडचिरोलीत आता परिस्थिती नियंत्रणात आहे. भीतीचं वातावरण नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

मला धमक्या देणारा मारला की नाही माहीत नाही

आम्हाला गडचिरोलीचा विकास करायचा आहे. त्या भागाचा विकास आम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे. जिल्ह्यात विकासकामेही सुरू झाली आहेत, असं त्यांनी सांगितलं. मला धमकी देणारा यात मारला गेलाय का याचा तपास पोलीस आणि गृहविभाग करेल. अशा अनेकवेळा धमक्या आल्या आहेत. त्याला मी घाबरलो नाही, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

गडचिरोलीत नक्षलविरोधी कारवाईत मिलिंद तेलतुंबडेसह ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आली समोर , वाचा ठार झालेल्यांची संपूर्ण यादी

खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा; संजय राऊत यांचं आव्हान

गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार; वळसे पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक, पहा काय म्हणाले गृहमंत्री?