केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेचे तीन तेरा, माजी नगरसेवकासह नागरिकांचा कचरा पेटवून निषेध

| Updated on: Aug 03, 2021 | 12:19 AM

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेचे तीन तेरा, माजी नगरसेवकासह नागरिकांचा कचरा पेटवून निषेध
केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेचे तीन तेरा, माजी नगरसेवकासह नागरिकांचा कचरा पेटवून निषेध
Follow us on

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कल्याण मलंगगड रोडवरील नांदिवली परिसरात कचऱ्यामुळे हैराण नागरिकांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह कचऱ्याला आग लावून कचरा पेटवून देत निषेध नोंदविला आहे. तसेच केडीएमसीने लवकरात लवकर कचरा उचलला नाही तर उग्र आंदोलन करु, असा इशारा माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेने मे 2020 पासून शून्य कचरा मोहिम सुरु केली आहे. महापालिका हद्दीत कोरोना काळ सुरु असताना शून्य कचरा मोहिम राबविण्यास काही नगरसेवकांचा विरोध होता. तर काही नगरसेवकांनी त्याचे समर्थन केले होते. महापालिकेने शून्य कचरा मोहिम राबवित असताना कचरा कुंड्या काढून टाकल्या होत्या. महापालिकेने नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण करावे, असे आवाहन केले होते. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करुन द्यावा, अशी सक्ती महापालिकेने केली आहे.

महापालिकेची शून्य कचरा मोहिम

मात्र जे नागरीक ओला-सुका कचरा वर्गीकरण करुन देत नाही त्यांचा कचरा महापालिका स्विकारत नाही. त्यामुळे त्यांचा कचरा रस्त्यावर टाकला जातो. टाकण्यात आलेला कचरा महापालिकेचे सफाई कर्मचारी उचलून कचरा गाडीत टाकत नाही. महापालिकेच्या शहरी भागात शून्य कचरा मोहिम चांगल्याप्रकारे राबविली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

27 गावांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य

केडीएमसीत आधी 27 गावे होती. त्यापैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 9 गावे महापालिकेत आहेत. गावे वगळण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. 27 गावातील कचरा योग्यप्रकारे आणि नियमीत उचलला जात नाही. 27 गावात प्रत्येक ठिकाणी कचरा उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अखेर माजी नगरसेवकाने कचरा पेटवून दिला

याबाबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. तरीदेखील प्रशासनाला काही एक फरक पडताना दिसत नाही. महापालिकेच्या कार्यप्रणालीला कंटाळून संतप्त नागरीकांच्या उपस्थित माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आज दुपारी नांदिवली येथील रस्त्यावर न उचललेल्या कचऱ्याला आग लावून पेटून दिलं. त्यांनी कचरा पेटवून महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. प्रशासनाने या निषेधाची दखल न घेतल्यास यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक पाटील यांच्यासह संतप्त नागरीकांनी दिला आहे.

हेही वाचा : Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार