लसीचे दोन डोस घ्या, नाही तर कारवाई करू; केडीएमसीचा दुकानदार, व्यापाऱ्यांना ‘डोस’

| Updated on: Dec 25, 2021 | 6:11 PM

ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंबर कसली आहे. पालिकेने आज शहरातील दुकानदार, व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.

लसीचे दोन डोस घ्या, नाही तर कारवाई करू; केडीएमसीचा दुकानदार, व्यापाऱ्यांना डोस
additional municipal commissioner sunil pawar
Follow us on

कल्याण: ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंबर कसली आहे. पालिकेने आज शहरातील दुकानदार, व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. सर्वांनी कोरोनाचे दोन डोस घ्या. ज्या दुकानदारांनी डोस घेतले नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी आणि दुकानदारांना दिला आहे.

ओमिक्रॉन व्हेरीयंटचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आज कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने महापालिका हद्दीतील व्यापारी, दुकानदार आणि हॉटेल्स चालकांची एक बैठक बोलाविली होती. व्यापारी, दुकानदार, कर्मचारी आणि ग्राहकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले हवेत अन्यथा महापालिका प्रशासनाच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.

लस बंधनकारकच

ओमिक्रॉनच्या धर्तीवर नवे नियम राज्य सरकारने लागू केले आहेत. दुकाने, हॉटेल, व्यापारी याठिकाणी होत असलेले गर्दी टाळा. दुकानात ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करावं. दुकानदारांनी सॅनिटायझरचा वापर करावा आदी विविध कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त पवार यांनी व्यापारी, दुकानदार, हॉटेल चालकांना केले. दुकानदार, ग्राहक, दुकानातील कर्मचारी यांचे लसीकरण झालेले हवे. त्यांनी पहिला आणि दुसरा डोस घेऊन चौदा दिवस झालेले हवेत. अन्यथा दंड आकारण्यात येईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

मास्क नसेल तर 10 हजाराचा दंड

दुकानात ग्राहक, कर्मचाऱ्यांनी मास्क घातला नाही तर दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाईल. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांना यापूर्वी प्रमाणे पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हॉटेल चालकांना 50 टक्के ग्राहक क्षमतेने हॉटेल चालविण्याची मुभा आहे. त्याचबरोबर दुकानदारांनी कोरोना नियमावली पालन केले नाही तर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने तपासणी पथके तयार केली आहेत. ही पथके कार्यरत आहेत. त्यात पोलिसांची मदत घेऊन संयुक्त कारवाई केली जाणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

फेरीवाल्यांवरही कारवाई करा

व्यापारी वर्गाचे कोरोना काळात प्रशासनाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. मात्र कोरोना काळात केवळ दुकानदारांवर कारवाई न करता रस्त्यावरील फेरीवाल्यांकडेही गर्दी होते. त्याकडेही लक्ष दिेले पाहिजे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे, असं व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी राकेश मुथा यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या:

ब्रेकिंग! अनिल परबांना सीबीआयचं समन्स?, प्रकरण नेमकं काय?, परब म्हणतात…

आधी नितेश राणेंचं म्याव, म्याव, मग मलिकांचा कॉकटेल ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा राणेंकडून ‘डुक्कर’, ट्विट, राजकारणाचा स्तर घसरतोय?

एसटी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगा; चंद्रकांतदादांचं अजितदादांना आवाहन