झटपट हजारो अंडी आणि कोंबड्या नष्ट, गावागावात कोंबड्या मारण्याचे आदेश; रायगडला बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने 10 किलोमीटर परिसरातील गावांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. पोल्ट्री व्यवसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे आणि त्यांना भरपाईची मागणी करत आहेत.

झटपट हजारो अंडी आणि कोंबड्या नष्ट, गावागावात कोंबड्या मारण्याचे आदेश; रायगडला बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला
Bird Flu
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 21, 2025 | 10:40 PM

राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने डोकं वर काढलं आहे. ठाण्यानंतर आता रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला आहे. उरणमधील चिरनेर येथील काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं आढळल्याने हजारो कोंबड्या मारण्यात आल्या आहेत. तसेच हजारो अंडीही नष्ट करण्यात आली आहे. तसेच चिरनेर परिसरातील गावांना कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहरात बर्ड फ्ल्यूचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर कोंबडी आणि अंडी विक्रेत्यांवर मोठी संक्रात कोसळली आहे.

रायगड जिल्ह्यातील उरणच्या चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या कोंबड्याचा गेल्या काही दिवसांपासून अचानक मृत्यू होत आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक भयभीत झाले होते. अचानक कोंबड्या मरत असल्याने या व्यावसायिकांनी पशूपालन अधिकाऱ्यांना त्याबाबतची माहिती दिली. या अधिकाऱ्यांनी पोल्ट्रीची पाहणी करून भोपाळ आणि पुण्याला या कोंबड्यांचे सँपल तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवालही आला आहे. त्यात यातील काही कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे चिरनेर परिसरातील हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली आहेत. तसेच चिरनेर परिसरातील 10 किलोमीटर अंतरावरील सर्व गावांना त्यांच्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

हजारो कोंबड्या नष्ट

स्वत: पशूपालन अधिकाऱ्यांनी गावात जाऊन हजारो कोंबड्या नष्ट केल्या. त्यासोबत हजारो अंडीही नष्ट केल्या आहेत. तसेच पुढील कारवाई सुरू केली आहे. कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यानंतर हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली. त्यानंतर ग्राहकांनी कोंबडी आणि अंडी खरेदी करण्यासाठी पाठ फिरवल्याने चिकन विक्रेते आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. तर, नागरिकांनी सतर्क राहावं, अधिक दक्षता घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

भरपाई द्या

बर्ड फ्ल्यू वाढू नये म्हणून केंद्र सरकारने 10 टीम तैनात केल्या होत्या. त्याशिवाय चिरनेर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. त्याशिवाय इतर सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. तसेच या भागात दोन टीम तैनात ठेवल्या आहेत. चिरनेर आणि आजूबाजूच्या परिसरावर पुढचे तीन महिने लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यासाठी या भागात तीन महिने पथक तैनात राहणार आहे, असं पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ भोजने यांनी सांगितलं. तर पोल्ट्री व्यवसाय कोलमडला आहे. आम्हाला आर्थिक डबघाईचा सामना करावा लागणार आहे. आमच्या नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्यांची भरपाई करण्यात यावी. ही भरपाई तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिक महेंद्र मोकल यांनी केली आहे.

Follow Us