Thane, Swine flu : ‘स्वाईन’च्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ, ठाण्यात 3 दिवसांत 5 जणांचा मृत्यू

ठाण्यात तीन दिवसांत पाच जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय. या मृतांमध्ये ठाण्यातील तीन तर कल्याण-डोंबिवली पाहिला हद्दीतील दोघांचा समावेश आहे. एकीकडे तब्बल 170 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Thane, Swine flu : स्वाईनच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ, ठाण्यात 3 दिवसांत 5 जणांचा मृत्यू
स्वाईन फ्लू
Shubham Kulkarni | Updated on: Aug 21, 2022 | 7:41 AM

ठाणे : दहीकाल्यात गोविंदांचे एकावर एक थर रचले जात असताना ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूची (Thane Swine flu) रुग्णसंख्या देखील वाढत आहे. स्वाईन फ्ल्यूचे (Swine flu) थर देखील रचले जात आहे, असं म्हणावं लागेल. दिवसागणिक वाढणारी स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या ठाण्याची (Thane) डोकेदुखी ठरतेय. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. जिल्ह्यात अवघ्या 3 दिवसांत 5 जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. या मृतांमध्ये ठाण्यातील तीन तर कल्याण-डोंबिवली या ठिकाणच्या दोघांचा समावेश आहे. एकीकडे तब्बल 170 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे मात्र, स्वाईन फ्ल्यूचा झपाट्यानं प्रसार वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा देखील कामाला लागली असून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांचा शोध घेतला जातोय. काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

रुग्णांचा आकडा 402

दोन वर्षांनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका कमी होत आहे. मात्र, आता साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं असल्याचं चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात मागील तीन दिवसांमध्ये स्वाईनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 52 रुग्णांची वाढ झाल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा 402 झाला आहे. तर या आजारानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पाचनं वाढ झाली आहे. या तीन दिवसांत ठाणे महापालिका हद्दीत 39 रुग्णांची वाढ झाल्यानं येथील एकूण रुग्णांची संख्या 291 इतकी झाली आहे. तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यानं मृतांचा आकडा आठ झाला आहे. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली सहा रुग्णांची वाढ झाल्यानं रुग्णांची संख्या 56वर गेली असून दोन जणांचा मृत्यूची नोंद झाल्यानं मृतांचा आकडा पाच इतका झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मोफत टेस्टिंग

नवी मुंबई : माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोविड आरटीपीसीआर लॅबमध्ये आता स्वाईन फ्ल्यूची टेस्टिंग सुरु करण्यात आली आहे. या टेस्टिंगसाठी रुग्णांचे घेतलेले सॅम्पल यापूर्वी पुणे शहरातील एनआयव्ही या लॅबमध्ये पाठवले जात होते. त्याचा अहवाल येण्यास उशीर होत असल्यानं त्याचा परिणाम उपचारावर होत होता. मात्र, हेच टेस्टिंग आता नवी मुंबईत होत असल्यानं उपचार गतिमान झाला आहे. स्वाईन फल्यूची टेस्टिंग करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. स्वाईन फ्ल्यूची टेस्टिंग मोफत केली जाणार आहे. 4 ऑगस्ट 2020रोजी सुरु करण्यात आलेल्या या कोविड टेस्टिंग लॅबमध्ये आतापर्यंत 13 लाख 73 हजार 288 इतक्या चाचण्यात करण्यात आल्या आहेत.

Follow Us