पाण्यातील लाकडाच्या ओंडक्यावर बसायला गेले, दोन्ही भावांचा घात झाला

लाकडाच्या ओंडक्यावर बसण्याची त्यांची इच्छा झाली. पण, आत पाणी जास्त असल्याने तिथं बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

पाण्यातील लाकडाच्या ओंडक्यावर बसायला गेले, दोन्ही भावांचा घात झाला
Image Credit source: socialmedia
Govinda Hatwar | Updated on: Jul 07, 2023 | 8:49 PM

संजय भोईर, प्रतिनिधी, ठाणे : पावसाचे दिवस असल्याने पावसात भिजावेसे वाटते. पाऊस पडल्यानंतर सखल भागात पाणी साचते. या पाण्यात लहान मुलं खेळत असतात. पण, पाण्यात खेळणे दोन चुलतभावांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली. त्यामुळे घरी लहान मुलं पाण्यात खेळत असतील तर सावध होण्याची वेळ आली आहे. १० आणि १५ वर्षींचे चिमुकले घराबाहेर पाण्यात खेळत होते. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. सोबत मित्रही होते. लाकडाच्या ओंडक्यावर बसण्याची त्यांची इच्छा झाली. पण, आता पाणी जास्त असल्याने तिथं बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

खदानीच्या खड्ड्यात साचले होते पाणी

भिवंडी शहरानजिक अंजूरफाटा खारबाव रस्त्यावर खदानीच्या खड्ड्यात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात खेळायला गेलेल्या दोघा सख्या चुलत भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणेश जोशी (वय 10 वर्षे) आणि पंकज जोशी (वय 15 वर्षे) दोघे रा. न्यू ओसवाल पार्क अंजूरफाटा अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

तरंगणाऱ्या ओंडक्यावर बसायला गेले

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजताच्या सुमारास हे दोघे चुलतभाऊ या पाणी साचलेल्या ठिकाणी खेळायला मित्रांसोबत खेळायला आले होते. त्यांना शेतात पाणी साचल्याचा भास झाला. त्या पाण्यात तरंगत असलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर दोघांनी उभे राहण्याचा प्रयत्न केला. ओंडका कलंडल्याने त्यावरील हे दोघे पाण्यात पडले.

मित्रांनी दिली कुटुंबीयांना माहिती

त्याठिकाणी त्यांच्या सोबत असलेल्या इतर मुलांनी याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पाण्यात शोधाशोध करून सायंकाळी या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी नारापोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या दुर्दैवी घटनेने जोशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us