कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले

| Updated on: Jul 23, 2021 | 11:25 PM

पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात घडली आहे.

कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले
कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले
Follow us on

कल्याण (ठाणे) : पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात घडली आहे. या दोघांचे मृतदेह एनडीआरएफच्या टीमने तब्बल 24 तासांनंतर बाहेर काढले. विशेष म्हणजे प्रशासनाकडून ठाणे जिल्हा हद्दीत पर्यटकांना नदी, धबधबा आणि तलाव क्षेत्रात जाण्यास मज्जाव करण्यात आलं आहे. तरीही पर्यटक अशा ठिकाणी जात असल्याने प्रशासनाचं लक्ष आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नेमकं काय घडलं?

कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारा 18 वर्षीय इशांत मोहाडीकर आणि 20 वर्षीय विनायक परब हे दोघे गुरुवारी (22 जुलै) मलंगगड भागात अन्य एका मित्रासह फिरण्यासाठी आले होते. चिंचवली परिसरातील नदीत हे दोघे पोहण्यासाठी उतरले. तर त्यांच्या एका मित्राला पोहता येत नसल्याने तो बाहेरच थांबला. मात्र नदीच्या पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने पाण्यात उतरलेले इशांत आणि विनायक हे वाहून गेले.

तब्बल 24 तास शोध मोहिम

संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने काल दिवसभर या दोघांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे आज अखेर एनडीआरएफच्या टीमने याठिकाणी येत शोधकार्य सुरू केलं. यावेळी एका तरुणाचा मृतदेह दुपारी साडेबारा वाजता, तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह संध्याकाळी साडेपाच वाजता सापडला. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर मलंगगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांना रोखणं गरजेचं असल्याचं मत पुन्हा एकदा व्यक्त होतंय.

हेही वाचा :

समोरून मगर, साप जात होते, चिपळूणमध्ये रेसक्यू केलेल्या नागरिकांनी सांगितला थरार