हिंगोली : मराठा आरक्षणाचा मुद्दा रखडलेला आहे. याकडे ना (Maratha Community) मराठा समाजातील राजकीय नेत्यांचे लक्ष आहे ना (State Government) राज्य सरकारचे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने (Hingoli) कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय.आजच्या बंदला अभूतपूर्व असा 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्याच व्यापाऱ्यानी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली या बंदमुळे आज रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शिवाय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाहीतर मात्र, आता मूक नव्हे तर ठोक मोर्चे काढले जाणार आहे.
दत्ता पाटील नावाचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला आता 12 दिवस उलटले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे सरकार मात्र त्या कडे दूर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या उपोषणकर्त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील मराठा समाजाने आज बंदची हाक दिली. आतापर्यंत कार्यकर्त्याच्या उपोषणाकडे लक्ष देणे गरजेचे होते पण तसे झालेले नाही.
राज्यात शिंदे-फडवणीस सरकार अस्तित्वात आल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे. त्याच भावनेतून मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे. विशेषत: मराठवाड्यात सर्वाधिक संख्येने असणारा मराठा समाज हा शासकीय सेवासुविधा पासून कोसो दूर आहे.गरीब मराठा समाजाचे सगळे अस्तित्व हे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र बदलत्या निसर्ग चक्रात शेतीचे उत्पन्न साथ देत नाहीये. त्यामुळे सरकारने आता तरी मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी हदगांव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणीकर हे मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण करत आहेत.
उपोषणाला आता बारा दिवस होत आले तरी त्यांच्या उपोषणाची अद्याप कुणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या उपोषणाकडे आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज आखाडा बाळापूर येथे बंद पुकारण्यात आलाय.आखाडा बाळापूर येथील आजच्या बंदला अभूतपूर्व असा 100 टक्के प्रतिसाद मिळालाय, अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्याच व्यापाऱ्यानी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली.