Abhijeet Dipke : तर खाकी पँट काढून हाफ चड्डी घाला अन् भाजपच्या कार्यालयासमोर उभं राहा; अभिजीत दीपकेंनी पोलिसांना सुनावलं
कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला आहे. पोलिसांना तरुणांनी केलेल्या रेकॉर्डिंगचा त्रास होण्याचं कारणच काय? एवढाच त्रास होत असेल तर पोलिसांनी तसं वागू नये. त्यांनी संविधान फॉलो करावे, असा टोलाच अभिजीत दीपके यांनी लगावला आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनात जेनजींकडून पोलिसांचं संभाषण, पोलिसांकडून झालेला हल्ला रेकॉर्ड करण्यात आला. त्यामुळे पोलीस उघडे पडले. जेनजीच्या या सतर्कतेमुळे पोलिसांनी आता एसओपी काढली आहे. भविष्यात आंदोलनावेळी रेकॉर्डिंग होण्याची भीती असल्याने त्यावेळी काय करायचं हे या एसओपीमध्ये नमूद केलं आहे. त्यावरून सीजेपीचे आंदोलक अभिजीत दीपके यांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पोलिसांनी फक्त संविधानाचं पालन करावं. त्यांनी भाजपच्या ऑर्डर फॉलो करू नये. तसंच करायचं असेल तर खाकी पँट काढून हाफ चड्डी घालून भाजपच्या कार्यालयाबाहेर जाऊन उभं राहा, अशा शब्दात अभिजीत दीपकेंनी पोलिसांना सुनावले आहे.
अभिजीत दीपके यांनी मीडियाशी बोलताना संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या एसओपीवरून पोलिसांना धारेवर धरलं. मला वाटतं तुम्हाला रेकॉर्ड व्हायची भीती असेल तर तुम्ही अशा गोष्टी का करता? आम्ही आंदोलन केलं. कॅमेऱ्यासमोर केलं. मीडियासमोर केलं. पोलिसांना काही रेकॉर्ड होईल याची भीती वाटते याचा अर्थ पोलिसांच्या मनात काही ना काही भीती आहे. पोलिसांनी एसओपी करण्यापेक्षा संविधान फॉलो करावे. पोलिस एका पक्षाचे नाहीत. ते भाजपच्या व्हॉटसअप फॉरवर्डवर चालणारे नाहीत. ते संविधानावर चालणारे आहेत. त्यांनी संविधानावर चालावे. तुम्हाला भाजपची ऑर्डर फॉलो करायची असेल आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर खाकी पँट काढून हाफ चड्डी घाला आणि भाजपच्या हेड क्वॉर्टरसमोर उभं राहा आणि म्हणा मै भी चौकीदार, असं अभिजीत दीपके यांनी सुनावले.
पोलीस आणि भाजपच्या गुंडांचं प्लानिंग
19 जुलैच्या रात्री आणि 20 जुलैच्या सकाळी मी दगडाने भरलेले ट्रक पाहिले. मी व्हिडिओ काढले. पोलिसांना विचारलं. दगडाने भरलेले ट्रक दिल्लीत आले कसे काय? आमचा मार्च सुरू झालेला नव्हता. फुटलेली व्हॅन उभी केली होती. पोलिसांचा हा आाधीच प्लान होता. दगडफेकीचं प्लानिंग पोलिसांचं होतं. मला शंका आली. तेव्हा मी डीसीपींना भेटलो. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही शंका घेऊ नका. तिथे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी हा ट्रक आला आहे. आम्ही म्हणलो, आम्हाला येड्यात काढू नका. हा सगळा प्लान आहे, अशी माहिती दीपकेंनी दिली. पोलीस आणि भाजपच्या गुंडांचं हे प्लानिंग होतं. शेतकरी आंदोलन आणि सीएनआरसीतही हेच केलं आहे. जेव्हा जेव्हा आंदोलन होतं तेव्हा भाजप आणि दिल्ली पोलिसांचं ट्युनिंग कसं राहतं हे पाहिलं असेलच, असंही ते म्हणाले.
पवार, मोदी मोठे नेते
यावेळी त्यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरही भाष्य केलं. शरद पवार आणि मोदी हे फार मोठे नेते आहेत. त्यामुळे ते भेटले असतील. पवार हे जंतरमंतरवर विचारपूस करायला आले होते, असं त्यांनी सांगितलं. तसेच भाजपवाले सध्या बरीच गणितं लावत आहेत. अशी गणित बरीच लागली. आधी चायनाचं लागलं. पाकिस्तानचं लागलं, आता हे लागतंय. अनिश माझा मित्र आहे. त्याच्या घरी नेहमी राहतो. दिल्लीत आल्यावर माझा मुक्काम अनिशच्याच घरी असतो, असंही त्यांनी सांगितलं.