
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. या अमानुष हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्य जनतेपासून संतांपर्यंत संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर भारताकडून पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करणार आहेत. आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ‘मन की बात’चा १२१ वा भाग असणार आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ त्याचबरोबर मंत्री अतुल सावे हे आज संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
गोंदिया जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास मोठ्या मेघगर्जनेसह वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाली आहे, अचानक आलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचं दिसून येत आहे.
हिंगोली-जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हळद उत्पादक शेतकऱ्यांची उडाली धांदल
फळ बगांचं नुकसान होण्याची शक्यता
उकाड्या पासून नागरिकांना काहिसा दिलासा
संजय गायकवाडला मेंदू आहे का नाही हा प्रश्न पडला असल्याचे ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार
यांनी म्हटले आहे. हा हल्ला देशावर आहे धर्मावर नाही, बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्माच्या दिशेने हा हल्ला नेला जात आहे असेही केदार यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत यासाठी मातोश्रीबाहेर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘मायेची सावली एक हात कर्तव्याच्या. मराठी माणसाच्या हितासाठी सुरक्षेसाठी व गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी उद्धव साहेब व राज साहेब आपण दोघं एकत्र या.महाराष्ट्रातील जनता आपली वाट बघतेय’. असा आशय लिहिलेला बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांने लावलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजन या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहेत. त्या आता अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर ते थेट काश्मीरला गेले आहेत. ते म्हणालेत की, ,”दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून काश्मीरला येऊ नका म्हटलं. पण काश्मीर आमचं आहे. इथे प्रत्येक देशवासीय येणार हे सांगायला मी आलो आहे. तुम्ही कोण सांगणार ,आम्ही इथं येऊ नको म्हणून , तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नका.आम्ही येणारच.माझं कुठलंही शूटिंग इथं नाही.मला कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीने किंवा हॉटेल्सने पैसे देऊन बोलावलं नाही.” असं म्हणत अतुल कुलकर्णी यांनी काश्मीर दौरा केला आहे.
“गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडावा. महाराष्ट्रातदेखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा, असं फर्मान सरकारने काढलं आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील इशारा दिलेला आहे. आता पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचं कारण नाही. जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रमशाळेत घडला आहे.सनमडी इथल्या नामांकित आश्रमशाळेमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक केली. विनोद जगधने असं मुख्याध्यापकाचं नाव आहे.
इंदूर-हैदराबाद महामार्गाचा मोबदला मिळण्यासाठी मुक्ताईनगर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला प्रसंगी दोन्ही कट्टर विरोधी आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार एकनाथ खडसे एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन्ही आमदार एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळालं.
“आपण जबाबदार शिवसैनिक आहोत लक्षात ठेवावं. त्यांचा बोलण्याचा उद्देश पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. संजयराव तुमच्या तक्रारी असतील तर माझ्याकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा. वर्दीचा आदर असला पाहिजे. मी त्यांना फोन करून नाराजी व्यक्त केली,” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड यांचे कान टोचले. यावेळी एकनाथ शिंदे यांनीसुद्धा दिलगिरी व्यक्त केली.
नाशिकच्या पांडवलेणी इथल्या डोंगरावर अडकलेल्या दोन पर्यटकांची सुटका करण्यात आली. पिता-पुत्र असलेले ॲड. उमेश वालझाडे आणि तेजस वालझाडे हे ट्रेकिंगला गेले असता पांडवलेणी डोंगरावर अडकले होते. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांकडून त्यांची सुटका करण्यात आली.
“पहलगामचा हल्ला हा आत्म्यावर आहे. हा हल्ला दुर्दैवी होता. यातही काहीजण राजकारण करतात. काही लोक बाहेर पडले की थेट देशाच्या बाहेर जातात. त्यांचं त्यांना लखलाभ. पाकिस्तानचं कायमचं कंबरडं मोडलं पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे. खून का बदला खून,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये झाली शाब्दिक बाचाबाची… काँग्रेसचे नेते, उमेदवार सुरेश हसापुरे आणि सुभाष देशमुख गटाचे अप्पासाहेब पाटील या दोन्ही उमेदवारांमध्ये मतदानाच्या करणावरून झाला वाद… विरोधी पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या अंगावर गेले धावून… पोलिसांनी तात्काळ मध्यस्ती करत वाद मिटवला… सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन माजी संचालकांमध्ये झाला वाद… श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलविरुद्ध श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये सुरूय थेट लढत…
बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून गोमांस तस्करी होत असल्याने घातला गोंधळ… बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तिघांना पकडून दिले कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात… तिघांकडून बारा ते तेरा किलो गोमांस बॅगेत भरून तस्करी करत असल्याचे आले समोर…नकल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडून चौकशी करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारताकडून संभाव्य प्रत्युत्तरात्मक हल्ल्याची पाकिस्तानला भीती…
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) हाती घेतला आहे. दहशतवाद्यांचे नेटवर्क, स्थानिकांची मदत आणि संभाव्य स्लीपर सेल्सचा तपास एनआयए करत आहे. एनआयए घटनास्थळी जाऊन तपास करत आहे.
मुंबईच्या बांद्रा मातोश्री परिसरामध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बॅनर वॉर रंगलं आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचे बॅनर महानगरपालिकेकडून काढण्यात आले तर शिवसेनेच्या बॅनरवर एक मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
विक्रोळीमध्ये बनावट आधार कार्ड बनवत बांगलादेशी या ठिकाणी वास्तव्याला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. किरीट सोमय्या हे विक्रोलीत दाखल झाले आहेत.
पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सशक्त संघटन पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला सुनील तटकरे त्याचबरोबर खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित असणार आहेत.
पोलिसांचं खच्चीकरण करून दिलगिरी व्यक्त करणे ही तर सरकारची नामुष्की असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी दिली. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल आक्षेपार्य टीका केली होती आणि आज याबाबत त्यांनी विधानावर ठाम असून पोलिसांची दिलगिरी मागतो असे स्पष्ट केलं..
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही, असे वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. सर्व लाडक्या बहिणी खुष आहेत असे ते म्हणाले. अगोदर विरोधकांनी हे पंधराशे रुपये देखील देणार नाहीत यांची देण्याची ऐपत नाही असा प्रचार सुरू केला होताय मात्र पंधराशे रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयावर जास्त जोर धरला आहे, असे ते म्हणाले.
एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सर्वांना घालवण्याची व्यवस्था केल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुणे महापालिकेला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. त्याबद्दल पुणे अर्बन डायलॉग आयोजित करण्यात आला आहे. हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मनपाच्या उपक्रमाचे कौतूक केले.
अंबरनाथमध्ये चिंधीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांना बोलवण्यात आले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोअर ग्रुपची बैठक आज दिल्लीतील झंडेवालान कार्यालयात होणार आहे. या बैठकीला मोहन भागवत, दत्तात्रेय होसबोले यांच्यासह सहा सहकार्यवाह उपस्थित राहणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संघाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रथमच एकत्र येत आहे.
दर रविवारी पर्यटकांनी गजबजलेले असलेले पहलगाम मार्केट आज बंद आहे. पहलगाव येथील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटक नाही. पर्यटकच नसल्याने अनेक व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ त्याचबरोबर मंत्री अतुल सावे आज संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत. जे पी नड्डा यांच्या हस्ते शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या ट्रू बीट युनिटचे उद्घाटन आणि हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांची राहणार प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पुणे : किरकोळ वादातून तिघांनी मलंग मेहबूब कुरेशी (वय ६०) यांना मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना वानवडी भागात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्यांचा मुलगा सोहेल (वय २८) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आदिल शेख, आकाश धांडे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : नियोजित गृहप्रकल्पातील पाचव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात घडली. दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला. बांधकाम मजुरांना सुरक्षाविषयक उपकरणे न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहितकुमार जांगडे (वय ३५) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. दुर्घटनेत बांधकाम मजूर शिवनाथ सुपेकर (वय ४०) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदार वसंत अर्जुन निंबाळकर (वय ४४, रा. वारजे माळवाडी) यांच्याविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस फौजदार विजय जगताप यांनी याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.