Uddhav Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला नाकार्ते म्हणाले, त्यावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड प्रत्युत्तर
Uddhav Thackeray : "मी कर्ज मुक्ती दिली त्याने बँकांना फायदा होणार होता. तुमची कर्जमुक्ती कोणाला फायदा करुन देणार आहे. मी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकून कर्जमाफी करुन दिली होती" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘तुमसे ना हो पायेगा’ या तुमच्या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाकार्त्यांचं आंदोलन म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “ठीक आहे तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे. त्यांची पंचाईत अशी झालीय की, प्रवीण स्वामी सांगत होते, तिथले लोक सांगत होते या भागातल्या समस्या हा नाकार्तेपणा कोणाचा आहे?” “5 ऑक्टोंबरला पंचनामे सुरु होणार हा नाकार्तेपणा माझ्या काळातला नाही. चारा छावण्या कधी सुरु करणार, अच्छे दिन आयेंगे मोदी बोलले. पण कब आयेंगे?” असं उद्धव ठाकरेंनी विचारला. “शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, किती वर्ष पाहिजे तुम्हाला. मागच्यावर्षी अतिवृष्टी झाली. इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. जमीन खरडून गेलेली. प्रतिहेक्टर साडेतीन लाख रुपये देणार होता. साडेतीन रुपये तरी दिले का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
“मी कर्ज मुक्ती दिली त्याने बँकांना फायदा होणार होता. तुमची कर्जमुक्ती कोणाला फायदा करुन देणार आहे. मी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकून कर्जमाफी करुन दिली होती” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, मनापासून देतो. पण त्यांनी मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिवे लावण्याचं काय ते ते आवाहन केलय. शेतकऱ्यांच्या घरातले दिवे विझत असताना तुम्ही दिवे लावणार का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
‘शेतकरी मेला तरी चालेल,पण..’
“पाच ऑक्टोंबर तारीख तुम्ही जाहीर केली, पण पाच ऑक्टोंबरला कुठला मुहूर्त काढला माहित नाही. कायदा जनतेसाठी असतो, जनता कायद्यासाठी नसते. आपत्ती आल्यावर निकषात बसत नाही म्हणून थांबणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही नाकार्ते आहात” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “पुढच्या आठवड्यात पश्चिम विदर्भात नितीन बापू शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहेत. आज इकडे मराठवाडा मुक्तीदिन निमित्त झालं. इतर महाराष्ट्रासाठी गरज नाही. गेल्यावर्षीची मदत अजून मिळालेली नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “सत्ताधारी कमी पडतायत. याचं कारण मराठवाड्याचं नेतृत्व हे लोक संपवत आहेत. मराठवाड्यातला शेतकरी मेला तरी चालेल. पण शक्तीपीठ मार्ग झाला पाहिजे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.