उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर, कोकणातील राजकीय वातावरण तापणार, आजच्या घडामोडी काय?

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे बारसूसह इतर गावातील ग्रामस्थांशी संवाद आणि त्यानंतर सायंकाळी जाहीर सभा होणार आहे.

उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर, कोकणातील राजकीय वातावरण तापणार, आजच्या घडामोडी काय?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne | Updated on: May 06, 2023 | 10:52 AM

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्प चांगलाच चर्चेत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रकल्पाला केलेला विरोध. पोलिसांनी केलेली कारवाई. ग्रामस्थांचा विरोध जुगारून सुरू असलेले माती परीक्षण, उद्धव ठाकरे यांनी दिलेले पत्र, आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका यामुळे हा प्रकल्प चांगलाच तापला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहे. त्याच दरम्यान राज ठाकरे हे देखील कोकण दौऱ्यावर आहे. याशिवाय भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनेही प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे कोकणात आज राजकीय वातावरण तापणार हे निश्चित झाले आहे.

उद्धव ठाकरे हे दहा वाजेच्या दरम्यान रत्नागिरी येथील साखरकुंभे गावात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहचले आहे. त्यानंतर वाहनांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सोलगावच्या दिशेने रवाना झाले आहे. उद्धव ठाकरे हे रिफायनरी प्रकल्पाला का विरोध करत आहे याबाबत जाणून घेणार आहे.

साखरकुंभे गावातून सोलगाव आणि त्यानंतर बारसू येथील ग्रामस्थांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहे. त्याच दरम्यान कातळशील्प येथेही उद्धव ठाकरे पाहणी करणार आहे. त्यानंतर सायंकाळी महाड मध्ये सभा होणार आहे. खरंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेला यापूर्वी परवानगी नाकारली होती.

याच दरम्यान भाजप आणि शिवसेनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात समर्थनार्थ मोर्चा काढला जाणार आहे. याच मोर्चावरून आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका देखील केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचीही कोकणात सभा होत आहे. त्यामुळे आज संपूर्ण दिवस कोकणात मोठ्या नेत्यांचा गराडा असणार आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये सत्ताधारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांचे पत्र दाखवत रिफायनरी प्रकल्पाची मागणी त्यांच्याच काळात करण्यात आली होती म्हणत सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला होता.

त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी थेट बारसूतील ग्रामस्थांना भेटण्यासाठी जाणार आणि तिथे माझी भूमिका जाहीर करणार असे जाहीर केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा आज दौरा होत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा देखील होणार आहे.

खरंतर बारसू रिफायनरीच्या संदर्भात ग्रामस्थांचा विरोध असेल प्रकल्प दूर करू नाहीतर सुरू करू अशी भूमिका यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय संवाद होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us