‘शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री तोपर्यंत गुंडांची पैदास होईल’, ठाकरेंकडून गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याचा दाखला

"सत्ताधारी पक्षांमध्ये आता गँगवार सुरु झालेलं आहे. मिंदे गँग आणि फडणवीस गँग, पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतोय, पोलीस हतबल झाले आहेत. कायदा आमच्या संरक्षणासाठी आहे, पण तो कायदाच हतबल झाला असेल तर मग असे गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कुणी कुणाला द्यायचा?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री तोपर्यंत गुंडांची पैदास होईल, ठाकरेंकडून गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याचा दाखला
Chetan Patil | Updated on: Feb 04, 2024 | 6:15 PM

सिंधुदुर्ग | 4 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधील घटनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “तुम्ही विनायक राऊत आणि वैभव नाईक यांना निवडून दिलं नसतं तर इकडे संपूर्ण गुंडागर्दी आणि गँगवार झालं असतं, जे काल-परवा कल्याणमध्ये घडलं. सत्ताधारी पक्षांमध्ये आता गँगवार सुरु झालेलं आहे. मिंदे गँग आणि फडणवीस गँग, पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतोय, पोलीस हतबल झाले आहेत. कायदा आमच्या संरक्षणासाठी आहे, पण तो कायदाच हतबल झाला असेल तर मग असे गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कुणी कुणाला द्यायचा? मी गणपत गायकवाड यांची बाजू घेत नाहीय. पण गणपत गायकवाड यांनी जे स्टेमेंट केलं आहे, त्यांनी सांगितलंच आहे की, गोळ्या झाडल्या. पण एक लक्षात घ्या, तिकडे काय घडलं होतं याचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं होतं? ते खरंतर कोर्टात द्यावं लागतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“किती तत्परतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घातल्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. कुणी आणलं? आणलं असेल? पण हे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही जनतेसमोर आणलं, आणि जसं तुम्ही सांगताय की, गणपत गायकवाड हा गुंड आहे, हा मारेकरी आहे. त्याने स्वत:च मान्य केलं आहे. मान्य करताना तो जे बोलला आहे, त्याने सांगितलं की, मिंद्यामुळे मला गुंडगिरी करावी लागली. मिंदे जोपर्यंत बसलाय. शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यांमध्ये गुंडांची पैदास होईल, हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे”, असा दाखला उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘त्यांचे करोडो रुपये मिंध्यांकडे आहेत, त्याची चौकशी होणार आहे की नाही?’

“त्याही पलिकडे जावून आता काल-परवा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. घोटाळा, घोटाळा. त्यांना अटक होत असेल तर गणपत गायकवाड यांनी जे दुसरं स्टेटमेंट केलं आहे की, त्यांचे करोडो रुपये मिंध्यांकडे आहेत, त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही, की चौकशी न होता क्लीनचीट ही मेरी मोदी गॅरंटी आहे हे आता कळेल”, असं ठाकरे म्हणाले.

“50 खोके तर गिळलेच, पण आता जे दिसेल ते खाऊ. तुम्ही सिंधुदुर्गात ते बघितलं. मी तुम्हाला धन्यवाद देतो. मी मनापासून सांगतो, मी इथून सुरुवात केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. महाराष्ट्राला सांगणार आहे, काळजी करु नका. जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो हे सिंधुदुर्गकरांनी दाखवून दिलं आहे. तेव्हा जमिनी ढापण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या ना? त्यावेळी शिवसैनिक तुमच्यासोबत नसते आणि तुम्ही शिवसेनेसोबत राहिला नसता तर हा संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि सिंधुदु्र्ग कुणाच्यातरी खासगी सातबाऱ्यावर चढवलं गेलं असतं”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

 

Follow Us