‘जो पाजील माझ्या नवर्‍याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, दारुमुक्त ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनोखं अभियान

| Updated on: Jan 15, 2021 | 8:08 PM

येणारी ग्रामपंचायत निवडणूक पूर्णपणे दारुमुक्त ठेवण्याचे आवाहन जिल्हा दारुमुक्ती संघटनेतर्फे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी केले आहे

‘जो पाजील माझ्या नवर्‍याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, दारुमुक्त ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनोखं अभियान
Follow us on

गडचिरोली : ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच दारुचे व्यसनी नकोत. त्यासाठी त्यांना निवडून देणारे मतदार नशेत नको. म्हणून येणारी ग्रामपंचायत निवडणूक पूर्णपणे दारुमुक्त ठेवण्याचे आवाहन जिल्हा दारुमुक्ती संघटनेतर्फे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी केले आहे (Unique mission by Dr Abhay Bang for Alcohol Free Villages during Election).

गडचिरोली जिल्ह्यात शासकीय दारूबंदी आहे. शिवाय गावा-गावातील स्त्रिया आणि मुक्तीपथ संघटना आपले गाव दारुमुक्त करत आहेत. एक हजार गावांतून दारूबंदीच्या समर्थनाची निवेदने शासनाकडे गेली आहेत. अशा जागृत जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा कारभार चांगला चालण्यासाठी सरपंच आणि सदस्य दारू पिणारे नसणे आवश्यक आहे. म्हणून ‘दारुमुक्त ग्रामपंचायत निवडणूक’ हे अभियान सुरू करण्यात येत आहे. मुक्तीपथद्वारे सर्व गावांमध्ये सभा घेऊन गावाचा प्रस्ताव घेण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीचे पॅनेल आणि उमेदवारांकडून दारू न पिण्याचा आणि न वाटण्याचा वचननामा लिहून घेण्यात येईल. वचन न देणार्‍या उमेदवाराला मत देण्यात येणार नाही.

या पूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व पक्षांच्या उमेदवारांनी वचननामे दिले होते. शेकडो गावातील स्त्रियांनी प्रस्ताव पारित केले होते की ‘जो पाजील माझ्या नवर्‍याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ या अभियानामुळे जिल्ह्यातील निवडणुका जवळपास दारुमुक्त राहिल्या. आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या दरम्यान गावागावात दारू पिणारे, पाजणारे निवडून येण्याचा प्रयत्न करतील. दारुडा सरपंच म्हणजे गावाचे नुकसान.

निवडणुक दारुमुक्त, तर ग्रामपंचायत दारुमुक्त. म्हणून गावागावातील स्त्रिया, मुक्तीपथ संघटना, गाव आणि जागृत नागरिकांनी ‘दारुमुक्त ग्रामपंचायत निवडणूक’ हे अभियान चालवावे. गाव दारुमुक्त करण्याची ही उत्तम संधी मतदारांना व स्त्रियांना आहे. ‘जो पितो दारू, जो पाजेल दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ अशी घोषणा सर्वांनी द्यावी व ग्रामपंचायत दारुमुक्त करावी, असं आवाहन दारुमुक्ती संघटनेने केलं आहे.

जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग आणि उपाध्यक्ष देवाजी तोफा आहेत. सल्लागार डॉ. प्रकाश आमटे, हिरामण वरखेडे आणि डॉ. राणी बंग आहेत. कार्यकारिणी सदस्य शुभदा देशमुख (कुरखेडा), डॉ. सूर्यप्रकाश गभने (वडसा), डॉ. शिवनाथ कुंभारे आणि विलास निंबोरकर (गडचिरोली), देवाजी पदा (धानोरा), डॉ. मयूर गुप्ता आणि संतोष सावळकर (मुक्तीपथ) हे आहेत. प्रत्येक तालुक्यातून 2 प्रतिनिधी आणि प्रत्येक गावात मुक्तीपथ गाव संघटन अशी मिळून ‘जिल्हा दारुमुक्ती संघटना’ तयार झाली आहे.

संघटनेचे हे अभियान जिल्ह्यातील 1000 गावांचा आणि 1 लाख मतदारांचा आवाज असल्याने ते हमखास यशस्वी होईल आणि ग्रामपंचायती दारुमुक्त होतील, असा विश्वास संघटनेतर्फे डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

गडचिरोलीत ‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा हजार पार’, ठराव घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

दारुबंदी समीक्षा समिती’ बनवण्याचा लोकहित विरोधी निर्णय रद्द करा, वनराई संस्थेचे अध्यक्ष रविंद्र धारिया यांची मागणी

BLOG: लोकलढा दारूमुक्तीचा : ‘दारू’कारण

व्हिडीओ पाहा :

Unique mission by Dr Abhay Bang for Alcohol Free Villages during Election