सोसाट्याचा वारा अन् गारांचा तडाखा, कोकणापासून विदर्भापर्यंत अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळीने झोडपलं
Maharashtra Unseasonal Rain : आज राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

राज्याच्या विविध भागात सूर्य आग ओकत असताना आज अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. नागपूर मध्ये दोन दिवसांच्या कडक उन्हानंतर आज दुपारच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासूनच कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. मागील काही दिवस ढगाळ वातावरणानंतर दोन दिवसांपासून चांगलाच उन्हाचा तडाका पाहायला मिळाला होता. तापमान 44 अंशाचा घरात गेले असताना आज अचानक दुपारी वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा एकदा गारवा जाणवत आहे.
सांगलीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वायफळे येथे गारांचा पाऊस झाला. दिवसभर उन्हाचा कडाका आणि सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तासगाव तालुक्यामध्ये हजेरी लावली. वायफळे परिसरामध्ये गारांचा पाऊस बरसला. उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस,
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात इटोली, येलदरी यासह काही भागामध्ये, वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली असून, अचानक झालेल्या या पावसामुळे, वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुपारी तीन ते चार च्या दरम्यान, वादळ वारे सुरू झाले आणि त्यानंतर काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून, या भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बीडच्या पाटोदा परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
बीडच्या पाटोदा शहर व परिसराला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने परिसरातील अनेक घरावरील पत्रे उडाले आहेत. याबरोबरच अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली. तहसील कार्यालयाच्या आवारात विविध योजनांची माहिती देण्यासाठी उभारलेला जाहिरात फलक देखील या वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे. काही वेळ झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून मात्र पाटोदाकरांची सुटका झाली.
इंदापूरच्या निमगाव केतकीत गारपीट
ऐन उन्हाळ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली. या पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घरावरील पत्रे उडून गेले आहेत. पालखी महामार्गावरील अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर झाड कोसळून काही काळ रस्ता देखील बंद झाला होता.
भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाका
भंडारा जिल्ह्यात संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्याने लाखनी पालांदूर राज्य मार्गावर झाडे कोसळली व झाडे विद्युत तारांवर पडून विद्युत प्रवाह असलेले थांब रस्त्याच्या कडेला कोसळले. यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही, मात्र झाडे विद्युत खांबावर पडल्यामुळे वाहतूक थांबली होती. काही काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. काही वेळाने नागरिकांनी रस्त्यावरील झाडे बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
येवल्यात अवकाळी पावसाची हजेरी
येवला शहरासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत काळे ढग दाटून आले आणि संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला तर विशेष म्हणजे, पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीही रस्त्यावर उतरल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.
साताऱ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी
साताऱ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी अचानकच सातारा शहरासह भागात ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळल्याचे चित्र पाहायला मिळालं. वाढेफाटा चौकाचा ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळल्याने काही वेळासाठी या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती
रत्नागिरीत पहाटे अवकाळी पाऊस
रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मे महिन्याच्या मध्यावर तापमान वाढीमुळे रत्नागिरीकर उखाड्याने हैराण झाले होते. कोकण किनारपट्टी भागातील हवेतील आद्रता 80 टक्क्यांवर गेल्याने तापमानात तीन ते चार अंशांची वाढ झाली आहे. पहाटे अवकाळी पाऊस झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ हवामान पहायला मिळाले.