
राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस आल्याने अनेक झाडे पडली असून शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने रस्त्यावर उभी असलेल्या दुचाकी देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
सांगलीच्या मिरज उत्तर भागासह तासगाव तालुक्यातल्या मनेराजुरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. मनेराजुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसलेला आहे. वादळी वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या दुचाकी खाली पडल्या,तर या वाऱ्यामुळे रस्त्यावरच्या अनेक ठिकाणची झाडे देखील उन्हाळून पडली मिरज तालुक्यातल्या सिद्धेवाडी, भोसे आसपासच्या परिसरासह रत्नागिरी-नागपूर महामार्गावर विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. सकाळपासून प्रचंड उकाडा वाढला होता, दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालं होऊन अनेक भागात अवकाळी पाऊस आणि हजेरी लावली आहे.
धाराशिवमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. लोहारा, धाराशिव, तुळजापूर परिसरामध्ये अवकाळी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे गहू,हरभरा,ज्वारी पिकासह फळबागांना फटका बसला आहे. या भागात पंधरवड्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यापूर्वी गारपिटीमुळे द्राक्ष, आंबा, कलिंगड बागायतदार शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली असून शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. उन्हाचा तीव्र कडाका सुरू असतानाच वातावरणात अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाला आणि दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सध्या कांदा आणि गहू काढणीचा हंगाम सुरू असताना या अनपेक्षित पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आपला माल वाचवण्यासाठी शेतात धाव घेतली.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. सकाळ आणि दुपारच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळच्या वेळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. लांजा तालुक्यातील आरगाव, व्हेळ रिंगणे ,कुरंग वीलवडे आदी भागांमध्ये पावसाची हजेरी झाली. अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत.
पाटण तालुक्यात आणि कोयना नगर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली मोठ्या प्रमाणावर गारपीट असून यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या अवेळी आलेल्या पावसामुळे कलिंगड आणि आंब्याच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय आणि हंगामामध्ये आलेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते असे म्हटले जात आहे.
आज सायंकाळी कोल्हापूर शहराच्या उपनगरात विजेच्या कडकडाटात सह पाऊस पडला. फुलेवाडी परिसरात नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाला मोठी आग लागली. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह अनेक गावांना पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वळीवाचा पाऊस कोसळला. कोल्हापूर शहरात वीजांच्या तारांना स्पार्क झाल्याने इमारतीच्या गच्चीवरील पाल्याला आग लागल्याची घटना घडली.