अजित पवार असं काय म्हणाले की अमित शाह यांना हसू आवरेना…

महाराष्ट्र आणि गुजरात काही वर्षांपूर्वी एक होते. दोन्ही राज्यात सहकारातून क्रांती झालेली आहे. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्ष प्रयत्न करत होतो. कोणी ही डेरिंग केलं नाही.

अजित पवार असं काय म्हणाले की अमित शाह यांना हसू आवरेना...
AJIT PAWAR AND AMIT SHAH
Mahesh Pawar | Updated on: Aug 06, 2023 | 5:37 PM

पिंपरी चिंचवड | 6 ऑगस्ट 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात विविध कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. तर, पुण्यातील आरोग्य शिबीरीलाही अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमांच्या निमित्ताने अमित शाह आणि अजित पवार हे पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणामुळे अमित शाह यांना हसू आवरेनासे झाले होते.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात अमित भाई हे गुजरातचे आहेत. पण, त्याचं महाराष्ट्रावर अधिकचं प्रेम आहे. अजितदादांनी असं म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावर अजित पवार पुढे म्हणाले, अरे थांबा थोडं, ते प्रेम का आहे, हे ऐका. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असते. हे अमित भाईंच्या रूपाने पहायला मिळतं. अजित दादांनी असे म्हणताच अमित शाह यांना हसू आवरेना.

महाराष्ट्र आणि गुजरात काही वर्षांपूर्वी एक होते. दोन्ही राज्यात सहकारातून क्रांती झालेली आहे. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्ष प्रयत्न करत होतो. कोणी ही डेरिंग केलं नाही. हे डेरिंग फक्त अमित भाईंनी दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे असे अजित पवार म्हणाले.

म्हणून आजचा निर्णय घेतला

अजित पवारांनी असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं कारण हेच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात. फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीचं हे करू शकतात. शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीचं करू शकतात. दिवाळीत ही सुट्टी न घेणारे असे ते पंतप्रधान आहेत असे अजित पवार यावेळी म्हणाले.

फक्त जावई नव्हे तर जन्मच महाराष्ट्रातला – फडणवीस

अजित दादा यांनी अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई असे म्हणाले. हे खरंय. पण, त्यांचा जन्म मुंबईतला आहे. त्यांची कर्मभूमी गुजरात आणि दिल्ली असली तरी त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आहे. शिवाय काही काळ त्यांनी महाराष्ट्रातही काम केलंय. त्यामुळं अमित भाईंना महाराष्ट्राची जाण आहे. म्हणूनच ते महाराष्ट्राचा विचार अधिक करतात, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

अजित दादा बरोबर आहे ना – एकनाथ शिंदे

अमित शहा त्यावेळी म्हणाले होते, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्यामागे उभे आहोत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारला एक वर्ष झाले. हे कार्य पाहूनच अजित दादांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत केंद्रात सहकार विभाग सुरू करण्याची हिंमत अमित भाईंनी दाखवलं. बरोबर ना अजित दादा? हे बोलण्याचं आणि ते मान्य करण्याचं ही धाडस लागतं असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित दादांच्या विधानात आणखी भर टाकली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us