शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावणार का? विरोधकांच्या मागणीनंतर कृषिमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
राज्यात पावसाभावी दुष्काळ पडला आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने विशेष अधिवेश बोलावं अशी मागणी विरोधकांकडून होत आहे, यावर आता कृषिमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊसच झाला नसल्यामुळे दुष्काळाचं सावट आहे, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष अधिवेश बोलावलं पाहिजे, अशी मागणी सध्या विरोधकांकडून सुरू आहे. यावर आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अधिवेशन बोलवण्याची काही गरज नाही, कारण आम्ही सर्व एकच आहोत ना. शेवटी शेतकऱ्याला आपल्याला मदतच करायची आहे, त्यामुळे त्यासाठी अधिवेशनाची गरज नाही, असं भरणे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र दुष्काळाचं सावट आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हाता, तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. काल 76 आणि आज छप्पन तालुक्यांचा आढावा आम्ही बैठकीच्या माध्यमातून घेतला आहे. शेतकऱ्याला मदत करणं सहकार्य करणे हे निश्चितच सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे की अडचणीच्या काळामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे. ज्या ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी उभा राहील, त्या त्या सर्व गोष्टी सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान आज अकोल्यामध्ये कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली, या बैठकीमध्ये काही अधिकारी बैठक सुरू असताना देखील सोशल मीडियावर व्यस्त असल्याचे पहायला मिळाले, यावर देखील यावेळी भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता सध्या हे विषय महत्त्वाचे नाहीत, तर आपल्या शेतकऱ्यांची काय नेमकी परिस्थिती आहे, हे महत्त्वाचं आहे. कोणी एखादा होपलेस माणूस मोबाईल खेळला, गेम खेळला, याकडे माझ्या सकट आपण देखील लक्ष देऊ नये. शेतकऱ्याला आधार देणं, शेतकऱ्यांना मदत करणं सध्या महत्त्वाचं आहे. असंही यावेळी भरणे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी अनेक स्वप्न रंगवले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे. शेतकऱ्याला नीट झोप लागत नाहीये, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आपल्याला आधार दिला पाहिजे आणि यावर आपण चर्चा केली पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.