पुनर्वसन होण्याआधीच घाईगडबडीने धरणात पाणी साठवण्याचा प्रशासनाचा अट्टाहास; धरणग्रस्त महिलेचा बळी गेल्याचा आरोप

| Updated on: Jun 07, 2022 | 7:31 PM

आजरा तालुक्यातील उचंगी धरणाचे काम हे अंतिम टप्यात आले असून यावर्षी धरणात पाणीसाठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. तर त्याबाबतीत योग्य नियोजन करण्याच्या सुचना जिल्ह्यातील मंत्र्यांनी दिल्या आहेत.

पुनर्वसन होण्याआधीच घाईगडबडीने धरणात पाणी साठवण्याचा प्रशासनाचा अट्टाहास; धरणग्रस्त महिलेचा बळी गेल्याचा आरोप
चाफवडे
Image Credit source: tv9
Follow us on

आजरा (कोल्हापूर) : आजरा (Ajra) तालुक्यातील शेतीचा प्रश्न सुटण्यासाठी उचंगी धरणाचे काम सुरू करण्यात आलं आहे. हे काम गेले 20 वर्षांपासून सुरू असून गेल्या काही वर्षांपासून याकामाला गती आली होती. त्यामुळे 20 वर्षांपासून रखडलेल्या घरणात यावर्षी पाणी साठविण्यास सुरूवात होणार आहे. तसे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल आहे. त्यामुळे धरण (Uchangi dam) क्षेत्रात आता पाणी साठायला सुरुवात झाली आहे. तर चाफवडे गावाला लागणाऱ्या शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा यावर्षी धरणाच्या पाण्यामुळे सुटणार आहे. मात्र यामुळे गावातील अनेकांची घरे यात बुडणार आहेत. त्यामुळे अनेकांनी आपले साहित्य हलवण्यासाठी तयारी ही केली आहे. तर काही आपले साहीत्य हलविण्यासाठी धडपडत आहेत. याच धांदलीत येथे एका धरणग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये (Project affected) संतापाची लाट उसळली आहे. तर रंजना अशोक धडाम (वय 50) असे मृत धरणग्रस्त महिलेचे नाव आहे. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता घडली. तर त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आजरा तालुक्यातील उचंगी धरणाचे काम हे अंतिम टप्यात आले असून यावर्षी धरणात पाणीसाठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. तर त्याबाबतीत योग्य नियोजन करण्याच्या सुचना जिल्ह्यातील मंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे चाफवडे गावातील लोकांना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र चाफवडे गावातील लोकांचे पुनर्वसन अजून करण्यात आलेले नाही. त्याच अगोदर घाईगडबडीने धरणात पाणी साठवण्याचा अट्टाहास जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील मंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोप गावातील लोकांनी केला आहे.

यादरम्यान धरणात पाणी साठवल्यास गावातील काही घरे ही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहित्य हलवण्यासाठी धरणग्रस्तांची धडपड सुरू आहे. तर रंजना धडाम यांचे घर देखील या वर्षी धरणात बुडणार आहे. त्यामुळे त्यांनी घरातील साहित्य इतरत्र हलवायला सुरुवात केलीय. राहते घर सोडून जावे लागत असल्याने रंजना धडाम अस्वस्थ होत्या. काल घरावरील पत्रे काढत असताना त्यांना चक्कर आली आणि त्या खाली काढून ठेवलेल्या पत्रांवर कोसळल्या. डोक्याला इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान हा दुर्दैवी प्रकार असल्याने प्रकल्पग्रस्तांना मध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुनर्वसन होण्याआधीच घाईगडबडीने धरणात पाणी साठवण्याचा अट्टाहास जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी केलाय. या अट्टाहासापायीच धरणग्रस्त महिलेचा बळी गेल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान रंजना धडाम त्यांना उपचारांसाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद अशोक गंगाराम धडाम यांनी आजरा पोलिसांत दिली आहे.