ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर ‘सिंदूर वन’ पार्क बांधले जाणार, काय असतील वैशिष्ट्ये ?

भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. याअंतर्गत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. आता या थीमवर पार्क उभारले जाणार आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर सिंदूर वन पार्क बांधले जाणार, काय असतील वैशिष्ट्ये ?
| Updated on: Jun 03, 2025 | 9:07 PM

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच पाकिस्तानचे अनेक हवाई तळही उद्ध्वस्त केले. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची जगभरात चर्चा झाली.

भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता या धर्तीवर एक पार्क बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्कचे नाव सिंदूर वन असे असणार आहे. हे पार्क गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात बांधले जाणार आहे. या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. त्याच ठिकाणी या पार्कची उभारणी केली जाणार आहे.

आठ हेक्टरमध्ये पार्क बांधले जाणार

गुजरातमधील कच्छमध्ये पाकिस्तान सीमेजवळ हे पार्क बांधले जाणार आहे. या पार्कबद्दल माहिती देताना मुख्य वनसंरक्षक संदीप कुमार यांनी म्हटले की, हे पार्क आठ हेक्टरमध्ये बांधले जाणार आहे. या पार्कला ‘सिंदूर वन’ असे नाव देण्यात येणार आहे. या पार्कमध्ये सेना, नौदल, हवाई दल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) या भारतीय सशस्त्र दलांना समर्पित विविध विभाग असणार आहेतॉ. भुज शहराजवळील मिर्झापूर गाव या उद्यानासाठी निवडण्यात आले आहे.

हे पार्क सशस्त्र दलांना समर्पित केले जाणार

संदीप कुमार यांनी या पार्कबाबत बोलताना सांगितले,की “ऑपरेशन सिंदूरला समर्पित असणाऱ्या या उद्यानात आम्ही ४० ते ४५ प्रजातींची सुमारे ८०,००० झाडे लावणार आहोत. आम्ही या उद्यानात आमच्या सशस्त्र दलांचे शौर्याचे प्रदर्शन करणार आहोत. उच्च घनतेचे वृक्षारोपण असलेले हे उद्यान पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणार आहे.

भारतीय सैन्याचे ऑपरेशन सिंदूर

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईत लष्कराने ६ आणि ७ मे च्या रात्री पाकिस्तान आणि त्यांच्या ताब्यातील काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याच काळात पाकिस्तानकडून अनेक हल्ले करण्यात आले होते, मात्र हे हल्ले भारतीय संरक्षण यंत्रणेने हे सर्व हल्ले हाणून पाडले होते.