अन् अचानक संसार त्यागाचा निर्णय घेतला… दोन बहिणी होणार संन्यासिनी; अख्ख कुटुंबच बनलं…

प्रत्येक माणूस जन्माला येतो. नंतर तो संस्कारीत होतो. प्रत्येकाचा जन्म सारखा असतो, पण प्रत्येकाचं जगणं, आयुष्य सारखं नसतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्येकजण वेगवेगळ्या भूमिकेत जगत असतो. कुणी डॉक्टर, कुणी वकील, कुणी राजकारणी, कुणी समाजसेवक म्हणून तर कुणी आणखी काही म्हणून जीवन जगत असतो. हे जीवन जगत असतानाच आयुष्याच्या एका वळणावर एक मोड येतो आणि अचानक....

अन् अचानक संसार त्यागाचा निर्णय घेतला... दोन बहिणी होणार संन्यासिनी; अख्ख कुटुंबच बनलं...
Sanyasis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2024 | 10:03 PM

मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस येथे राहणाऱ्या दोन बहिणी संन्यासिनी होणार आहेत. रिया दीदी आणि गुंजन दीदी असं त्यांचं नाव आहे. गुंजन दीदीने आधी आपले आजोबा, आईवडील आणि भावाला जैन संत होताना पाहिलं. आता या दोन्ही बहिणी मोक्षाच्या मार्गावर निघाल्या आहेत. 15 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील आचार्य विमर्श सागर महाराज यांच्याकडून आर्यिका दीक्षा घेऊन संयमाच्या मार्गावर या दोन्ही बहिणी चालणार आहेत. या कुटुंबातील सहा सदस्य संन्यासाच्या मार्गावर गेले. अशीच घटना समाधिस्थ आचार्य विद्यासागर महाराज यांच्या आयुष्यात पाहायला मिळाली होती. आचार्य विद्यासागर महाराज यांच्या हयातीतच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मोहमाया त्यागत संन्यास दीक्षा घेतली होती. त्यानंतर शिवपुरीतील हे कुटुंब त्याच मार्गावर जात आहे.

संन्यास दीक्षा घेताना रिया दीदी आणि गुंजन दीदीद यांच्या 12 आर्यिका आणि 1 मुनी दीक्षा आचार्य विमर्शसागर महाराज यांच्याद्वारे होणार आहे. या 13 दीक्षार्थींचं शिवपुरीत आगमन झालं होतं. छत्री जैन मंदिरात आधी एक गोद भराई दीक्षेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नगरात धर्म साधकांची भव्य बिनौली शोभायात्रा काढण्यता आली. या शोभायात्रेत जैन समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील विविध भागातून हे लोक आले होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी राजकीय क्षेत्रातील लोकही उपस्थित होते. आता या दोन्ही बहिणी दिल्लीत 15 नोव्हेंबर रोजी आर्यिका दीक्षा घेणार आहेत.

वैराग्य कसं आलं

रिया दीदी आणि गुंजन दीदी दोघी सख्ख्या बहिणी आहेत. रिया दीदी 25 वर्षाच्या आहेत. तर रिया यांनी हायर सेकेंड्रीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. रिया या शिलाई कामात निपुण आहेत. शहरात कुठलंही लग्न असेल तर रिया दीदीलाच मेहंदी काढण्यासाठी बोलावतात. एवढ्या त्या लोकप्रिय आहेत. गुजंन दीदी या 29 वर्षाच्या आहेत. त्यांनी बीएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांचे आईवडील मुनि विश्वार्थ सागर, आई आर्यिका विननयांश्री, भाऊ मुनि विशुभ्र सागर आणि आजोबा मुनि विश्वांत सागर महाराज यांनी 2016मध्ये संन्यास दीक्षा घेतली होती.

पन्ना नगर येथे आचार्य विमर्श सागर महाराज यांच्या हस्ते ही दीक्षा देण्यात आली होती. गुंजन दीदीने हा सोहळा पाहिला होता. त्यामुळे त्यांच्या मनातही वैराग्याचा भाव आला आणि त्यांनी मोक्षाच्या मार्गावर जायचा निर्णय घेतला. आर्यिका व्रत ग्रहण केल्यानंतर संसार आणि कुटुंबाशी असलेलं नातं तुटतं. त्यामुळे या दोन्ही बहिणींनी याचा अभ्यास घरीच केला. त्यानंतर ब्रह्मचर्य व्रत घेऊन धर्मसाधनेच्या मोक्षाच्या मार्गावर त्या गेल्या आहेत.

आईलाही प्रेरणा

शिवपुरीतील आणखी एका महिलेने संन्यास दीक्षा घेतली आहे. किराणा व्यवसाय असलेल्या कुटुंबातील मित्रवर्ती यांनी 2023मध्ये सोनगिर येथे आचार्य विमर्श सागर महाराज यांच्या हस्ते ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं होतं. आता त्या 68व्या वर्षी आर्यिका दीक्षा घेतील. त्यांना त्याची प्रेरणा मुलीकडून मिळाली. त्यांची मुलगी आर्यिका विक्रांत श्री आहे. त्यांनाही 15 नोव्हेंबर रोजी आर्यिका दीक्षा देण्यात येणार आहे.