ते जीवघेणे दीड तास… 182 प्रवासी… एमर्जन्सी लँडिंग; विमानात नेमकं काय घडलं?

कोझिकोड येथून विमानाने उड्डाण घेतलं. त्यानंतर दीड तासाने तिरुवनंतपूरम विमानतळावर विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या प्रवाशांना दम्मामला घेऊन जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

ते जीवघेणे दीड तास... 182 प्रवासी... एमर्जन्सी लँडिंग; विमानात नेमकं काय घडलं?
Air India Express aircraft
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2023 | 2:06 PM

तिरुवनंतपूरम : एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होता होता वाचला आहे. केरळच्या कोझिकोडहून दम्माम (सौदी अरेबिया)च्या दिशेने विमानाने उड्डाण घेतलं होतं. मात्र एअर इंडियाच्या या विमानाची तिरुवनंतपूरम विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करावी लागली. विमानात एकूण 182 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानातील हायड्रोलिक गियरमध्ये बिघाड झाल्याने या विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती.

एटीसीकडून सूचना मिळाल्याबरोबर विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं आहे. सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी विमानाने उड्डाण केलं होतं. त्यानंतर विमानाच्या मागच्या बाजूला तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानाचा हायड्रोलिक गियर क्षतिग्रस्त झाला. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अचानक काही वेळाने हा बिघाड झाला. त्यामुळे विमान तातडीने उतरवले जात असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे विमानातील सर्वच प्रवाशांची पाचावर धारण बसली. विमान लँडिंग होईपर्यंत प्रवाशांचा जीव खालीवर होत होता. जेव्हा विमान सुरक्षितपणे लँड झालं आणि आपण जिवंत असल्याची खात्री पटली तेव्हा कुठे प्रवाशांचा जीवात जीव आला.

प्रवासी विमानतळावरच

कोझिकोड येथून विमानाने उड्डाण घेतलं. त्यानंतर दीड तासाने तिरुवनंतपूरम विमानतळावर विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या प्रवाशांना दम्मामला घेऊन जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. सध्या तरी प्रवाशांना विमानतळावरच थांबून ठेवलं आहे. या घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयानेही निवेदन जारी केलं आहे.

अशी घडली घटना

सकाळी 9.45 वाजता विमानाने कोझिकोड येथून उड्डाण केलं. दम्मामकडे हे विमान जात होतो. तेवढ्यात विमानात हायड्रोलिक फेल झाल्याने विमान तिरुवनंतपूरमकडे डायव्हर्ट करण्यात आलं. त्यानंतर विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली. दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी विमानाला तिरुवनंतपूरम विमानतळावर लँड करण्यात आलं. त्यामुळे प्रवाशांच्या जीवात जीव आला.

 

नेमकं काय घडलं?

कलीकटहून टेकऑफ केल्यानंतर विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला. त्यामुळे पायलटने तात्काळ विमानातील इंधन अरबी समुद्रात डंप केलं. तसेच विमानाची सुरक्षित लँडिंग केली. यावेळी विमानतळावर आणीबाणी लागू करण्यात आली. या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. त्यांना दुपारी 3.30 वाजता तिरुवनंतपूरमहून दुसऱ्या विमानाने दम्मामला पाठवलं जाणार आहे.