शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्याचा केंद्रीय मंत्री असलेला बाप सैरभैर, पत्रकारांची कॉलर पकडून शिवीगाळ

| Updated on: Dec 15, 2021 | 10:38 PM

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावर शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा गुन्हा दाखल आहे. सध्या त्यांचा मुलगा तुरुंगात आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री पत्रकारांची कॉलर पकडू लागले आहेत.

शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्याचा केंद्रीय मंत्री असलेला बाप सैरभैर, पत्रकारांची कॉलर पकडून शिवीगाळ
Ajay Mishra Teni
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra Teni) यांच्या मुलावर शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा गुन्हा दाखल आहे. सध्या त्यांचा मुलगा तुरुंगात आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री पत्रकारांची कॉलर पकडू लागले आहेत. अर्वाच्य भाषेत शिव्या देऊ लागले आहेत. (Ajay Mishra abuses journalist over question about jailed son)

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार (Lakhimpur Violence) प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजित मिश्रा टेनी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर अजय मिश्रा यांनी त्या पत्रकाराला शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी एका टिव्ही चॅनेलच्या पत्रकाराने जेव्हा मंत्र्यांना एसआयटी तपासाबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते भडकले आणि शिविगाळ केली.

मिश्रा यांनी टीव्ही पत्रकाराला भीती दाखवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच एका पत्रकाराचा मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी टेनी म्हणाले की, ‘मुर्खासारखे प्रश्न विचारत जाऊ नका, डोकं बिघडलं आहे काय?’ त्यानंतर त्यांनी मोबाईल बंद केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय टेनीचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरुन विरोधकांकडून सातत्याने अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

लखीमपूर हिंसाचारावरुन संसदेत गोंधळ

आज लोकसभेत लखीमपूर हिंसाचार प्रकरणात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतरही लोकसभेत गोंधल सुरुच राहिल्यानं कामगार गुरुवार सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

लखीमपूर हत्याकांड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. त्यावेळी लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, केंद्र सरकारने गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करणार. राहुल गांधी आज या विषयावर सदनात बोलण्याचा प्रयत्न करतील असंही चौधरी यांनी सांगितलं होतं.

अजय मिश्रांवर गुन्हा दाखल करा, मलिकांची मागणी

पत्रकारांना धमकी देणार्‍या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. लखीमपूर घटना ही सुनियोजित कट होता असे एसआयटीने म्हटले असून या प्रकरणाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी शिविगाळ करत धमकी दिली शिवाय त्यांचे मोबाईलही जप्त केले हा मोठा गुन्हा आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

अजय मिश्रा टेनी हे राजीनामा देणार नाहीत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी स्वीकारून त्यांचा राजीनामा घ्यावा. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकावणे त्यांना ताब्यात घेणे हा कुठला कायदा आहे अशी विचारणा करतानाच मोदीजी, तुमचा मंत्री अवाक्याबाहेर जात आहे त्याच्याकडील तात्काळ मंत्रीपद काढून घ्यावे अशी जोरदार मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.

इतर बातम्या

Ramnath Kovind: राष्ट्रपती कोविंद बांग्लादेशच्या दौऱ्यावर, ‘विजय दिवस’ सोहळ्यात विशेष निमंत्रित

Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर, दौऱ्यात कोणती मोठी घोषणा?

Video | Shocking | Tragedy | गळफास घेण्याची एक्टिंग करताना स्टूलवरुन पडला आणि…

(Ajay Mishra abuses journalist over question about jailed son)