TV9 Special : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं अन् शांत कोनसीमा जिल्हा पेटला, तेही सर्वाधिक SC लोकसंख्या असताना, विषय हार्डय समजून घ्या

| Updated on: May 25, 2022 | 4:56 PM

सत्ताधारी वायसीपीने या दंगलींसाठी टीडीपी आणि जनसेना पक्षाला जबाबदार धरलं आहे. मात्र या पक्षांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. याउलट या दंगलीतील खऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी, अशी मागणी जनसेना पक्षाचे प्रवक्ते पवन कल्याण यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

TV9 Special : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं अन् शांत कोनसीमा जिल्हा पेटला, तेही सर्वाधिक SC लोकसंख्या असताना, विषय हार्डय समजून घ्या
आंध्रप्रदेशातील अमलापूरमच्या नामांतरावरून दंगल
Follow us on

नवी दिल्लीः देशाचं संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B R Ambedkar) यांचं नाव एका जिल्ह्याला किंवा एखाद्या भागाला दिलं जाणं ही तेथील नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब. विशेष म्हणजे ज्या जिल्हयात अनुसूचित जाती जमातींची संख्या जास्त आहे, तिथल्या लोकांना आक्षेप घेण्याचं कारणच नाही.  पण आंध्रप्रदेशात नेमकं याउलट घडलं. सरकारनं राज्याच्या पुनर्रचनेनंतर पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अमलापूरम (Amlapuram) मतदार संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा (Konseema) नाव दिलं आणि पाहता पाहता जनक्षोभ उसळला. काही राजकीय संघटनांनी या नामांतराचं स्वागत केलं मात्र निषेध करणाऱ्या संघटना एवढ्या आक्रमक झाल्या की अवघं शहर आंदोलनाच्या आगीत होरपळून निघालं. दोन दिवसांपासून धुमसणाऱ्या आंदोलनाच्या आगीत जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्री आणि आमदारांच्या बंगल्यालाही वेढलंय. एरवी शांत असलेला कोनसीमा जिल्हा असा एकाएकी का पेटून उठला? काय घडलं नेमकं ? अमलापूरम शहरातला घटनाक्रम काय होता? पाहुयात सविस्तर!!

आंध्रप्रदेशात कोनसीमा जिल्ह्यात नामांतरावरून आक्रमक झालेले आंदोलक

पुनर्रचनेनंतर नुकतंच दिलं नाव

आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांची नुकतीच पुनर्रचना झाली. यानुसार 13 जिल्ह्याचं विभाजन करून तो 26 नव्या जिल्ह्यांमध्ये विभागला गेला. नव्या रचनेवर झोन आणि शहरांची नावं बदलण्यासह 7 मार्चपर्यंत तब्बल 12,600 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. या सर्व गोष्टी विचारात घेऊन रेड्डी सरकारने किरकोळ बदल करत जिल्ह्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केलं. यातच पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अमलापूरम् मतदार संघाला आंबेडकर कोनसीमा असं नाव देण्यात आलं.

आक्रमक झालेल्या आंदोलकांनी बस पेटवली

SC समाज जास्त असूनही जनक्षोभ

जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातींची संख्या मोठी आहे. त्यामुळे आंबेडकर साधना समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर जिल्ह्याचं नाव आंबेडकर किंवा बालयोगी असं देण्यात आलं. कापू नेते मुद्रागदा पद्मनाभम् यांनीही हीच मागणी लावून धरली होती. इतर गैर राजकीय संघटनांनीदेखील कोनसीमा जिल्ह्याचं नाव बी आर आंबेडकर ठेवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र जिल्ह्यातील काही संघटना आणि त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाचा निषेध केला. काही दिवसांपूर्वी याच वादातून जिल्ह्यातील काही ठिकाणी हल्ले झाले. मतदारसंघातली परिस्थिती आणखी चिखळली. वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर येथे आता 144 कलम लागू करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

उसळलेल्या दंगलींसमोर पोलीस बेशुद्ध

जिल्ह्यातील कोनसीमा साधना समितीने अमलापूरमचं नाव जैसे थेच ठेवण्यासाठी काल तीव्र आंदोलन केलं. सरकारविरोधी घोषणा देणाऱ्या आंदोलकांनी अमलापूरमचे एसपी सुब्बा रेड्डी यांच्यावर दगडफेक केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जमावानं केलेल्या दगडफेकीत 20 पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाची आग एवढी भडकली की अमलापूरमचे डीएसपी बेशुद्ध पडले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. 3 RTC बसची जाळपोळ झाली. तर दोन खासगी बसही पेटवल्या गेल्या.

अमलापूरममध्ये आंदोलकांनी आमदाराचं घर पेटवून दिलं

मंत्री-आमदारांचं घरही पेटवलं

आंदोलकांनी मंत्री विश्वरुप आणि आमदार पोनड्डा सतीश यांच्या घरावरही हल्ला केली. प्रचंड संतापलेल्या जमावानं आधी मंत्री विश्वरुप यांना लक्ष्य केलं आणि त्यानंतर त्यांचं संपूर्ण घरच पेटवून दिलं. आंदोलकांनी आमदार सतीश यांच्या घरालाही सोडलं नाही.

दंगलखोरांची धरपकड

परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं पाहून पोलिसांनी गंभीर कारवाई केली. हिंसक जमावावर अश्रूधूराचा वापर, हवेत गोळीबार केला. तर आंदोलकांनी 7 खटले दाखल करण्यात आले. आंध्रप्रदेशचे पोलीस महासंचालक केव्ही राजेंद्रनाथ रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व अजामीनपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 46 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. आणखी 72 जणांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं स्थापन करण्यात आली आहेत. पूर्व गोदावरी जिल्ह्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाही ताब्यात घेण्यात आलंय.

अमलापूरम येथे सध्या तणावपूर्ण शांतता

अमलापूरममध्ये तणावपूर्ण शांतता

सध्या अमलापूरम येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे. परिसरात विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. अमलापूरममध्ये घडलेलं आंदोलन हे एका व्हॉट्सअप ग्रुपवरून पसरलेल्या अफवेमुळं होतं. ही अफवा थांबवण्यासाठी अमलापूरममध्ये काही काळासाठी इंटरनेट बंद करण्यात आलं. अशा प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांना इशारा देण्यात आला. आगामी आव्हानं लक्षात घेता अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी वॉर्निंगही पोलिसांनी दिली आहे.

राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप

सत्ताधारी वायसीपीने या दंगलींसाठी टीडीपी आणि जनसेना पक्षाला जबाबदार धरलं आहे. मात्र या पक्षांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. याउलट या दंगलीतील खऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी, अशी मागणी जनसेना पक्षाचे प्रवक्ते पवन कल्याण यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.