Agneepath Yojana : गोंधळ सुरूच; बिहारपासून सुरू झालेले विरोधाचे आंदोलन आता उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये, केंद्राने योजना मागे घ्यावी, आंदोलक तरूणांची मागणी

बिहारपासून सुरू झालेले हे आंदोलन आता उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पोहोचले आहे. सर्वप्रथम, छपरा, जेहानाबाद, मुंगेर आणि नवादासह बिहारच्या अनेक भागांमध्ये युवकांनी निदर्शने केली आणि ही अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी केली.

Agneepath Yojana : गोंधळ सुरूच; बिहारपासून सुरू झालेले विरोधाचे आंदोलन आता उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये, केंद्राने योजना मागे घ्यावी, आंदोलक तरूणांची मागणी
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 16, 2022 | 4:04 PM

नवी दिल्ली : लष्करात भरतीसाठी (Recruitment in Army) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशाच्या विविध राज्यात मोठ्या प्रमाणावर तरूण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी अग्निपथ योजनेच्या (Agneepath Yojana) विरोधात तरूण आंदोलन करत असून ही योजना नको भरती काढा अशी मागणी करत आहेत. तर ही योजना कशी युवकांच्या भल्याची आहे हे केंद्र सरकार आणि भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र बिहारमध्ये सुरू झालेला योजनेवरून वाद हा आता देशाच्या विविध राज्यात पोहचला आहे. गेल्या दोन दिवसांपासून यावरून चक्काजाम आंदोलन (Movement) केला जात आहे. तर कुठे रेल्वे गाड्या अडवल्या जात आहेत. तर कुठे रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान या योजनेवरून बिहारमध्ये सध्या गदारोळ पहायला मिळत असून बक्सरमध्ये तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली आहे. त्याचवेळी मुझफ्फरपूरमधील रस्त्यांवर गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. तर काही तरुणांनी पाटण्याकडे जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेकही केल्याचे समोर आले होते. केंद्र सरकारची ही योजना चुकीची आहे, चार वर्षांत सेवानिवृत्त होणार, पुढे काय करणार, असे संतप्त भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरूणांनी विचारलं आहे.

केंद्राने अग्निपथ योजना सुरू केल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये या योजनेबाबत आंदोलने होत आहेत. बिहारपासून सुरू झालेले हे आंदोलन आता उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पोहोचले आहे. सर्वप्रथम, छपरा, जेहानाबाद, मुंगेर आणि नवादासह बिहारच्या अनेक भागांमध्ये युवकांनी निदर्शने केली आणि ही अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनेही झाली. आंदोलकांनी जेहानाबादमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतूकही विस्कळीत केली. या कार्यक्रमाच्या निषेधार्थ छपरा येथे युवकांनी टायर जाळून बसची तोडफोड केली. पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार दगडफेक आणि लाठीचार्ज झाला. आंदोलकांनी पोलिसांच्या तीन गाड्या जाळल्या.

जेहानाबादमध्ये गाड्या थांबल्या

बिहारच्या जहानाबादमध्ये अग्निपथ योजनेवरून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जहानाबादमध्ये तरूणांनी लष्कराच्या नव्या भरती योजनेला विरोध करत काको मोरजवळ रस्त्यावर टायर जाळून रेल्वे रोखून धरली. लष्कराच्या नव्या भरती योजनेच्या निषेधार्थ गुरुवारी पहिल्याच दिवशी सकाळी बिहारच्या जेहानाबादमध्ये तरूणांनी गाड्या आणि वाहने रोखून जोरदार निदर्शने केली. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बिहारमध्ये विरोध कायम

कैमूर भाबुआ रोड रेल्वे स्थानकावर लष्कराच्या तयारीत असलेल्या तरूणांनी इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लावली. स्टेशन प्लॅटफॉर्मवर तोडफोड केली. तर रेल्वे ट्रॅकला आग लावून निषेध व्यक्त केला. दरम्यान आरा स्टेशनवर दगडफेक झाल्यानंतर 2 नंबर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. तर बक्सरमध्ये संतप्त तरूणांनी डुमराव रेल्वे स्टेशनला आग लावली. सुविधा एक्स्प्रेसच्या एसी बोगीच्या काचा फोडल्या.

हरियाणातही अग्निपथ योजनेच्या विरोधात गदारोळ

त्याचवेळी दिल्लीच्या शेजारील हरियाणा राज्यातील पलवलमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात प्रचंड गदारोळ झाला. गुरुग्राम आणि रेवाडीच्या बिलासपूर आणि सिद्रावली भागात शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. तरुण आंदोलकांनी गुरुग्राम-जयपूर महामार्गावरील बसस्थानक आणि रस्ते ताब्यात घेतले आणि बिलासपूर चौकात आंदोलने केली.

मुझफ्फरपूर आणि बक्सरमध्ये गोंधळ

यापूर्वी मुझफ्फरपूरमध्ये रस्त्यावर जाळपोळ आणि बक्सरमध्ये रेल्वे ट्रॅकवर निदर्शने करण्यात आली होती. बक्सरमध्ये तरुणांनी ट्रेनवर दगडफेक करत मुझफ्फरपूरमध्ये रस्त्यावर गोंधळ घातला होता. मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकाजवळील चक्कर चौकात तरुणांनी गोंधळ घालत गोबरशाही चौकात निदर्शने केली. तर बक्सरमध्ये रेल्वे ट्रॅकवर झालेल्या गोंधळादरम्यान, काशी पटना एक्स्प्रेस उमेदवारांनी सुमारे 10 मिनिटे आडवली होती. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलांनी बळाचा वापर करत त्यांना रेल्वे रुळावरून हटवले होते.

राजस्थानमध्ये ही आंदोलन

राजस्थानमध्ये ही केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध होत आहे. जयपूरमधील कलवार रोडवर मोठ्या संख्येने तरुण जमले आणि त्यांनी योजना परत घ्याच्या घोषणा दिल्या. तर ही योजना मागे घेण्याची मागणी खासदार हनुमान बेनिवाल यांनी केली आहे. तरुणांनी जयपूर-दिल्ली महामार्गावर चक्काजाम केला. दरम्यान तरुणांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अजमेर महामार्गही ठप्प झाला होता.