अरुणाचल आमचा भाग होता आणि राहिल, सत्य बदलणार नाही, चीनला भारताचा स्पष्ट संदेश
चीनच्या आक्षेपाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे. ही एक स्वयंसिद्ध वस्तुस्थिती असून त्यावर कोणीही वाद घालू शकत नाही.

अरुणाचल प्रदेशातील 27 जागा आणि खास जागांना भारताच्या अधिकृत नकाशावर त्याच्या मानका नावांसह प्रसिद्धी देण्याच्या भारताच्या पावलाने चीन संतापला आहे. सोमवारी चीनने यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर नवी दिल्लीने यावर स्पष्ट शब्दात अरुणाचल प्रदेश आमचा भाग आहे आणि राहिल अशा शब्दात सुनावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पुन्हा स्पष्ट केले की अरुणाचल भारताचा अभिन्न अंग आहे आणि हे सत्य कोणी बदलू शकत नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायसवाल यांना चीनच्या आक्षेपाबद्दल विचारले असता ते म्हणाले की अरुणाचल भारताचे एक अतुट आणि अभिन्न अंग आहे. हे सत्य इतके स्वच्छ आहे की यास कोणी बदलू शकत नाही.
चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे वारंवार बदलल्यानंतर,भारताने गेल्या आठवड्यात राज्यातील २७ ठिकाणे आणि महत्त्वाच्या स्थळांना भारताच्या अधिकृत नकाशावर त्यांच्या प्रमाणित नावांसह अधिकृतपणे जाहीर केले होते. त्यावेळी एका अधिकृत निवेदनात सरकारने म्हटले होते, ‘अरुणाचल प्रदेशच्या भारतीय सर्वेक्षण विभागाच्या नकाशावर या महत्त्वाच्या स्थळांना औपचारिकपणे घोषीत करण्याचा उद्देश त्यांची अचूक ओळख आणि लोकांमध्ये अधिक चांगली जागरूकता निर्माण करणे हा आहे.
हा मुद्दा खूप जुना
भारताच्या अधिकृत नकाशावर औपचारिकपणे घोषीत केलेल्या २७ महत्त्वाच्या स्थळांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) असलेल्या लाँग जूचा देखील समावेश आहे. १९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यातील सुरुवातीच्या संघर्षाच्या प्रमुख केंद्रांपैकी हे एक होते, जेव्हा चिनी सैन्याने या भागात प्रवेश केला होता. सरकारने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या कृतीला सातत्याने नाकारले आहे. अशा कृतींना ‘निरुपयोगी आणि मूर्खपणाच्या’ असे संबोधून, अरुणाचल प्रदेश’भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील’ हे अखंड सत्य त्यामुळे बदलणार नाही, असे निष्क्षून स्पष्ट केले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
नवी दिल्लीच्या या कृतीने पुन्हा संतप्त झालेल्या चीनने, अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्ये अधिकृत भारतीय नकाशांवर त्यांच्या प्रमाणित भारतीय नावांसह नोंदवण्याचा निर्णय ‘बेकायदेशीर आणि अवैध’ असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन म्हणाले, की ‘भारताने बेकायदेशीरपणे स्थापित केलेला कथित ‘अरुणाचल प्रदेश’ चीन मान्य करीत नाही. ‘परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, ‘चीनमधील जुनी नावे बदलून त्याजागी स्वतःची ‘प्रमाणित नावे’ देण्याचा भारताचा प्रयत्न बेकायदेशीर आणि अवैध आहे.” ते पुढे म्हणाले, ‘यामुळे झांगनान प्रदेश हा चीनचा भाग आहे, हे सत्य बदलत नाही.’ चीन तिबेटला “शिझांग” आणि अरुणाचल प्रदेशला “झांगनान” म्हणतो.
