‘पाकिस्तानला समजवण्याची नाही तर धडा शिकवण्याची वेळ’, असदुद्दीन ओवैसी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

पहलगाममध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांना सरकारने शहीदचा दर्जा दिला तर त्यांचा परिवाराचा योग्य सम्मान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शहीदचा दर्जा देण्याबाबत पावले उचलावी, अशी विनंती मी करत असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानला समजवण्याची नाही तर धडा शिकवण्याची वेळ, असदुद्दीन ओवैसी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी
asaduddin owaisi
| Updated on: May 05, 2025 | 9:48 AM

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम हल्ल्यावरुन पुन्हा वक्तव्य केले आहे. पाकिस्तानला समजवण्याची वेळ निघून गेली आहे. आता पाकिस्तानला उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान निर्लज्ज अन् अपयशी राष्ट्र आहे. त्यामुळे त्याला आता त्याने केलेल्या कृत्याबाबत शिक्षा देण्याची वेळ आल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.

बिहारमधील एका प्रचारसभेत बोलताना ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला. त्यांनी म्हटले की, आमचे सरकार पाकिस्तानला जोरदार उत्तर देईल. दहशतवाद संपवण्यासाठी भारत कठोर पावले उचलणार आहे. दहशतवाद्यांनी निर्दोष पर्यटकांची हत्या केली. त्यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही पाकिस्तानमधील राजकारणी पुरावे मागत आहे. पाकिस्तानला यापूर्वीही पठाणकोट, मुंबई हल्ल्याबाबत पुरावे दिले होते. परंतु त्यानंतरही पाकिस्तानने काहीच कारवाई केली नाही. पाकिस्तान निर्लज्ज राष्ट्र आहे. त्यामुळे त्याला समजवण्याची नाही तर शिक्षा देण्याची वेळ आली आहे. अन्यथा प्रत्येक दोन, चार महिन्यांत त्यांच्याकडून सामान्य लोकांची हत्या होईल, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या 26 पर्यटकांना शहीदचा दर्जा द्यावा, अशी मागणी ओवैसी यांनी केली. त्यांनी सांगितले की, पहलगाममध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांना सरकारने शहीदचा दर्जा दिला तर त्यांचा परिवाराचा योग्य सम्मान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शहीदचा दर्जा देण्याबाबत पावले उचलावी, अशी विनंती मी करत असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

ओवैसी यांनी भारतीय नौदलातील लेफ्टिनेंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवाल यांचा वक्तव्याचा संदर्भ घेत सांगितले की, पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी मुस्लीम आणि काश्मीरविरोधात द्वेष दाखवला नाही. त्यांनी फक्त शांतता आणि न्यायाची मागणी केली. हिंदू-मुस्लीममध्ये विष कालवणाऱ्यांसाठी त्यांचा संदेश महत्वाचा आहे. देशाला द्वेषाची नव्हे तर शांतता आणि एकतेची गरज आहे. जेव्हा आपण प्रेम आणि बंधुता वाढवू तेव्हाच आपला देश मजबूत राहील, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.