बिलावलच्या आईला मारणारे दहशतवादी अन् आम्हाला मारणारे चांगले का?; ओवैसींचा संतप्त सवाल; आफ्रिदीला म्हणाले जोकर

पुलवामासारख्या काश्मीर हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तान आणि त्यातील दहशतवादाचा निषेध केला आहे. बिलावल भुट्टो यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्या आईच्या हत्येचा उल्लेख करत सवाल उपस्थित केला आहे. शाहिद आफ्रिदी यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

बिलावलच्या आईला मारणारे दहशतवादी अन् आम्हाला मारणारे चांगले का?; ओवैसींचा संतप्त सवाल; आफ्रिदीला म्हणाले जोकर
bilawal bhutto asaduddin owaisi
| Updated on: Apr 28, 2025 | 12:50 PM

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी २२ एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यानंतर आता एम.आय.एम.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरले. तसेच पाकिस्तान आणि बिलावल भुट्टो यांच्यावरही टीका केली.

सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली, तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी सरकारला दहशतवादावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सरकारने योग्य विचार करून ठोस पावले उचलावीत. पाकिस्तान मलेरियाची औषधे बनवू शकत नाही, ते काय बोलणार? असा टोला असदुद्दीन ओवैसींनी लगावला.

देशातील निष्पाप लोकांना मारणारे चांगले का?

“शहबाज शरीफ सरकारमध्ये मंत्री असणारे बिलावल भुट्टो यांच्यावरही ओवैसींनी टीका केली आहे. बिलावल भुट्टो हे नुकतेच राजकारणात आले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांच्या आईची गोळ्या घालून हत्या केली. ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे. बिलावल यांच्या आईला मारणारे दहशतवादी आणि आमच्या देशातील निष्पाप लोकांना मारणारे चांगले का?” असा सवाल ओवैसींनी केला.

“आय.एस.आय, इसीस किंवा पाकिस्तानमधील इतर दहशतवादी संघटनांना भारतात हिंदू-मुस्लिम वाद व्हावा असे वाटते. काश्मीरमध्ये गैर-मुस्लिम राहू शकत नाहीत, हे त्यांना दाखवायचे आहे. जात-धर्म विचारून मारहाण करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. काश्मिरी आदिलने हिंदू-मुस्लिम असा भेदभाव केला नाही. जर कोणी हिंदू-मुस्लिम करत असेल, तर ते चुकीचे आहे”, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

भारत-पाकिस्तान युद्धाचा निर्णय सरकारने घ्यावा.

“भारत-पाकिस्तान युद्धाचा निर्णय सरकारने घ्यावा. सरकारने दहशतवाद कायमचा संपवावा, अशी आमची मागणी आहे. सरकारला त्यांचे काम करू द्या. पाकिस्तानला एफ.ए.टी.एफ.च्या ग्रे लिस्टमध्ये टाकणे आवश्यक आहे. भारत सरकारने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकावे, अशी आमची विनंती आहे. भारताला आत्मसंरक्षणासाठी हल्ला करण्याचा अधिकार आहे. बेकायदेशीर पैशातून दहशतवाद्यांना मदत मिळत आहे. सरकारने यावर कारवाई करावी”, असेही ओवैसींनी म्हटले.

शाहिद आफ्रिदी जोकर

“शाहिद आफ्रिदी कोण आहे? त्या जोकराचे नाव घेऊ नका.पंढरपूरच्या मंदिरात जसे हिंदू ट्रस्टी असतात आणि गैर-हिंदू राहू शकत नाहीत, तसेच वक्फमध्ये गैर-मुस्लिम का? हिंदूंच्या पंढरपूरमध्ये जसे नियम आहेत, तसेच नियम वक्फमध्ये का नाहीत? लिमिटेशन ॲक्टनुसार मालकी हक्क निश्चित केले जातात. नरेंद्र मोदी सरकारने 2C कायदा बनवला आहे, जो 12 वर्षांपासून जागा ताब्यात असलेल्या व्यक्तीला मालकी हक्क देतो, हे चुकीचे आहे. पुरातत्व खाते वक्फची जागा आपली म्हणते, मग ती मुस्लिमांना का दिली जात नाही?” असा सवाल ओवैसींनी केला.