Karnataka Cm : भाजपचं पुन्हा तेच? 15 ऑगस्टपूर्वी कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलणार? अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर घडतंय काय?

3 ऑगस्ट रोजी अमित शाह यांच्या दौऱ्यात बोम्मई एकाकी दिसले होते. तसेच त्यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यावरून आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून हटवले जाऊ शकते, असे भाजप नेत्यांचे मत आहे.

Karnataka Cm : भाजपचं पुन्हा तेच? 15 ऑगस्टपूर्वी कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलणार? अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर घडतंय काय?
Basavaraj Bommai
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 09, 2022 | 10:26 PM

बंगळुरू : नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या मास्टर प्लॅननंतर बिहारमध्ये (Bihar Political Crisis) सत्तेबाहेर पडलेला भारतीय जनता पक्ष आता कर्नाटकच्या राजकारणात मोठे बदल करु शकतो, असा अंदाज बांधला जातोय. कर्नाटक भाजप (Kanataka BJP) पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलू शकते. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटकच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता कर्नाटकात मुख्यमंत्रिपदात आणखी एका बदलाची अटकळ जोर धरू लागली आहे. कन्नड जिल्ह्यातील युवा नेत्याच्या हत्येनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर पक्षांतर्गत जोरदार टीका होत आहे. बोम्मई यांना 6 ऑगस्ट रोजी कोविडची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी आपला नवी दिल्ली दौराही रद्द केला. 3 ऑगस्ट रोजी अमित शाह यांच्या दौऱ्यात बोम्मई एकाकी दिसले होते. तसेच त्यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यावरून आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून हटवले जाऊ शकते, असे भाजप नेत्यांचे मत आहे.

दिल्ली दौरा का रद्द केला?

मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केल्यावरूनही आता तर्क लावले जात आहेत, कारण पक्ष नेतृत्वाने त्यांना पद सोडण्यास सांगितले असते. किंबहुना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि मंत्री गोविंद करजोल पुढील मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये आघाडीवर असल्याचेही बोलले जात आहे. भाजप नेत्यांनी मात्र या चर्चा फेटाळल्या आहेत. पण अशा अनुमानांवरून भाजप नेतृत्वात संभाव्य बदलाची चर्चा रंगत आहे. दरम्यान मंत्री उमेश कत्ती यांनी मुख्यमंत्रीपदात बदल झाल्यास त्यांचाही वाटा असेल, असे म्हटले आहे.

माजी आमदाराच्या विधानाचा अर्थही समजून घ्या

येडियुरप्पांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या भाजपच्या एका माजी आमदाराने असेच स्पष्ट विधान केलंय. भाजपचे माजी आमदार सुरेश गौडा सोमवारी तुमाकुरूमध्ये बोलताना म्हणाले स्वातंत्र्य दिनापूर्वीही मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात. तसेच पक्षात काहीतरी मोठं घडलं आहे. जे सर्वांना माहिती पडेल, असेही ते म्हणाले आहेत.

येत्या निवडणुकीची नेतृत्वाला चिंता

भाजप नेतृत्वाला कर्नाटकातील सरकारची आणि आगामी निवडणुकांची मोठी चिंता आहे. अलीकडेच पक्ष कार्यकर्त्यांच्या हत्या आणि ढिसाळ कारभार यासह विविध मुद्द्यांमुळे विश्वासार्हता गमावल्याने नेतृत्व अस्वस्थ आहे. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वालाही पक्षातील गटबाजीची चिंता वाढली आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी  गटबाजीमुळे अडथळे येऊ शकतात, आणि त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगायला लागू शकतात. त्यामुळे आत्ताच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.