
ऑपरेशन सिंदूरनंतर आम्ही भारतासोबत लढण्यास तयार आहोत, आम्ही प्रत्युत्तर देऊ असे मोठ मोठे दावे करणाऱ्या पाकिस्तानची खरी स्थिती अखेर आता जगासमोर आली आहे. बलोच बंडखोरांनी पाकिस्तानच्या सरकारला जेरीस आणलं आहे. बलोच बंडखोरांसमोर पाकिस्तानी सैनिक हतबल झाले आहेत. बलोच बंडखोरांकडून बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तानी सैनिकांसोबतच्या संघर्षाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत, ज्यामध्ये बलुचिस्तानमधून पाकिस्तानी सैन्य माघार घेताना दिसत आहे. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे, की आता खुद्द पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी देखील पाकिस्तानचा 40 टक्के भाग आमच्या हातून निसटल्याचं संसदेमध्ये कबूल केलं आहे.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी काय म्हटलं?
बलोच बंडखोरांनी पाकिस्तानच्या नाकात दम केला आहे, पाकिस्तानचं सरकार हातबल झालं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेमध्ये माहिती देताना म्हटलं आहे की, बलुचिस्तानमधल्या विशाल भौगोलिक परिस्थितीमुळे तिथे तैनात करण्यात आलेल्या सौनिकांना या बंडाचा बिमोड करण्यात यश मिळत नाहीये, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. बंडखोरांचा आमच्यावर प्रचंड दबाव आहे, बलुच लिबरेशन आर्मी आता केवळ फक्त एक बंडखोरांची टोळी राहिली नसून, त्यांचं एक जबरदस्त नेटवर्क तयार झालं आहे. त्यांच्याकडे वीस लाख रुपयांच्या रायफल्स आहेत, आमच्याकडे नाहीयेत, त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्र आहेत, ते पण आमच्याकडे नाहीयेत, असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानं म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, बलुचिस्तानचं क्षेत्रफळ हे फार मोठं आहे, पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी 40 टक्के क्षेत्रफळ हे एकट्या बलुचिस्तामध्ये आहे, मोठं क्षेत्रफळ आणि भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीमुळे या आघाडीवर आम्हाला अपयश येत असल्याचं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचं हे वक्तव्य पाकिस्तानची हातबलता दाखवत आहे, भौगोलिक परिस्थितीच कारण देऊन पाकिस्तानकडून आपला पराभव लपवला जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बलोच बंडोखोरांकडून स्वातंत्र्य बुलचिस्तानची मागणी करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर या लढ्यात त्यांना मोठं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.